वो सत्तर मिनट

‘पुढच्या सत्तर मिनिटांत प्राण पणाला लावून हॉकी खेळा. हार वा जीत, काहीही होवो. दाखवून द्या त्या सर्वांना ज्यांनी तुम्हाला हॉकी खेळण्यापासून रोखलं होतं, टोकलं होतं. ही सत्तर मिनिटं कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही...’ या अर्थाचं कबीर खान ऊर्फ शाहरुख खानचं ‘चक दे इंडिया’ चित्रपटातलं भाषण सर्वांनीच ऐकलेलं असेल. ऐकलं नसेल तर यू ट्यूबवर जाऊन नक्की ऐका किंवा घरी सीडी आणून पाहा. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मला कोच ऊर्फ गुरू कबीर खानचे हे शब्द अतिशय महत्त्वाचे वाटतात. शिष्यांच्या आत असलेलं स्फुल्लिंग चेतवण्याचं काम हे शब्द करतात. ते चित्रपटातले असले तरी असे उत्तेजन देणारे शब्द अनेकांना ऐकायला मिळालेले असतात. कधी अभ्यासाच्या बाबतीत तर कधी गाण्याच्या, कधी नृत्याच्या तर कधी खेळाच्या. ते ऐकवणारे नेहमी शिक्षकच असतात असे नव्हे. पण एका गुरूने शिष्याला जो धडा देणे अपेक्षित असते, तो या शब्दांमधून नक्की मिळत असतो.

गुरू म्हणजे जो शाळा किंवा महाविद्यालयात शिकवतो तोच नव्हे. कधी-कधी साध्या बस किंवा लोकलच्या प्रवासात एखाद्या व्यक्तीचं वागणं आपल्याला खूप काही शिकवून जातं. अनेकदा घरातल्या लहान मुलांकडून आपण शिकतो. अनेकदा कशाला, आईवडील तर आपल्या मुलांसोबत सतत शिकतच असतात काही ना काही नवीन. पशुपक्षी, झाडं यांच्याकडूनही शिकण्यासारखं खूप असतं, ते जाणून घेण्याची नजर असेल तर. आपल्या आधीच्या पिढीकडून तर आपण कितीतरी शिकू शकतो. म्हणजे हे सगळे आपले गुरूच होतात नं. शिक्षकांची शिकवण आपल्याला जन्मभर पुरत असते. पण होतं काय, आयुष्य जगण्याच्या धावपळीत आपण त्यांना विसरून जातो. मग गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना फोन केला, जाऊन भेटलं, पत्र टाकलं एखादं तर त्यांना बरं वाटतं, अजून आपली कोणाला तरी आठवण येतेय या जाणिवेने जगण्याला हुरूप येतो. ज्यांनी आपल्या जगण्याला अर्थ दिला, त्यांच्यासाठी एवढं नक्की शक्य आहे ना सर्वांनाच?

Comments