amhi doghi - आवडलेल्या या दोघी

एखाद्या कथेवर वा कादंबरीवर आधारित चित्रपट किंवा नाटक पाहायचं म्हटलं की, बऱ्याचदा पोटात गोळा येतो; खासकरून ती कथा वा कादंबरी आवडलेली असेल तर अधिकच. अशा कलाकृती अनेकदा मूळ लेखनापेक्षा डाव्या असतात, आणि वाचकाला या गोष्टीचा त्रास होतो. 'आम्ही दोघी' हा चित्रपट गौरी देशपांडे यांच्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर आधारित आहे ते कळल्यावर आधीचे काही अनुभव आठवणं जरा काळजीच वाटत होती. त्यात या कथेचा जीव फारच छोटा. मग अडीच तासांच्या सिनेमात नक्की काय असेल, अशी उत्सुकता साहजिकच मनात होती. परंतु, प्रतिमा जोशी यांनी त्यांच्या या पहिल्याच चित्रपटात मूळ कथेला व्यवस्थित न्याय दिला आहे. जेमतेम पाचसहा पानांची मूळ कथा चित्रपटाच्या लांबीनुसार फुलवण्याचं आव्हान प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी चांगलंच पेललं आहे. त्यांना प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे या मुख्य अभिनेत्रींनी जबरदस्त साथ दिली आहे.

'आम्ही दोघी'मधल्या दोघी आहेत, आईविना, करारी आणि शिस्तप्रिय बापासोबत वाढलेली मुलगी सावित्री (प्रिया बापट) आणि तिची सावत्र आई अमला (मुक्ता बर्वे.) दोघींमध्ये असलेला दुरावा, नंतर साधली गेलेली जवळीक यांचा हा प्रवास. परंतु या दोन्ही व्यक्तिरेखा साध्यासोप्या नाहीत. सावित्री भावनांच्या कल्लोळात न अडकणारी, प्रॅक्टिकल, बुद्धिमान. यशस्वी वकील असलेल्या पित्याने (किरण करमरकर) तिला तसंच सांगत मोठं केलंय. घरात नोकरचाकर असल्याने, पक्षकार येतजात असल्याने तिला तसं एकटं वगैरे वाटत नाही. आई अगदीच लहानपणी वारली असल्याने तिच्याकडे आईच्या आठवणी नाहीत, त्यामुळे आठवणींनी येणारे उमाळेही नाहीत. वडलांशी तिचा काहीच संवाद नाही. 'तुम्ही एकमेकांशी नाॅर्मल बोलतच नाही का, एकतर खवचटपणे तरी बोलता किंवा ओरडून तरी,' हा तिच्या मैत्रिणीचा प्रश्न त्यांच्या नात्याबद्दल सगळं काही सांगून जातो.

सावि दहावीत असताना वडील, ज्यांना ती आप्पा म्हणते, ते अचानक अमलाला घेऊन घरी येतात. अतिशय औपचारिक आधुनिक श्रीमंत घरात ही काळीसावळी, गावाकडची अमला येते तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं, परंतु ते दाखवण्याचं धाडस घरातल्या कोणातही नसतं. साविला राग येतो, पण तीही तो फारसा दाखवत नाही. तिला काय म्हणायचंय मी, तुमच्या बायकोला, असा थेट प्रश्न आप्पांना ती विचारते. क्वचित घरी येणाऱ्या मित्रमैत्रिणींना ही माझी सावत्र आई अशी आवर्जून ओळख करून देते. पदवी मिळवते आणि या घरापासून, आपल्यावर प्रेम न करणाऱ्या आप्पांपासून, दूर मुंबईला उच्च शिक्षणासाठी जाते. कोल्हापुरातल्या या घराशी आणि अर्थात आप्पा व अमलाशी संबंध तोडून अापण जातोय, असंच तिला वाटत असतं.

सावि मुंबईत येते, संशोधक होते, होस्टेल सोडून भाड्याने घर घेऊन मुंबईकर होते. तिथे तिला राम (भूषण प्रधान) भेटतो. तिची शाळेतली जीवलग मैत्रीण नेहा (आरती वडगबाळकर) आणि तिचा नवरा संदीप यांच्याशी तिची मैत्री कायम आहे. राम आणि ती प्रेमात पडतात. परंतु, प्रेम आणि विवाह या दोन स्वतंत्र गोष्टी असाव्यात, यावर सावि ठाम आहे. त्यामुळे ती लग्नाला ठाम नकार देते. ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिला मी कोणतेही प्रश्न विचारणार नाही, तिला माझ्यावर प्रेम न करण्याचंही स्वातंत्र्य आहे, असं मानणारी सावि आहे. पण मग पुढे काय होतं? तिचे हे स्वातंत्र्याबद्दलचे विचार, स्वकेंद्री भूमिका, भावनांना बाजूला ठेवून बुद्धीचा वापर करून कृती करणं, यातून ती आनंदी होते का? तिला नक्की हेच अपेक्षित आहे का? आईवडलांचा संसार तिने पाहिला नाही, परंतु अमला आणि आप्पांमधलं नातं तिने कळत्या वयात पाहिलंय. मला लग्नच करायचं नाहीये, असं ती आप्पांना ठामपणे सांगते, अमलालाही बोलून दाखवते. पण एक मित्र मिळाल्यावरही तिला तसंच वाटतं का? असे विचार आचरणात आणून सहज जगता येतं का, की जगणं आव्हानात्मक होत जातं, याची उत्तरं थेट पडद्यावर पाहिलेली बरी. या तिच्या प्रवासात अमलाचं नक्की स्थान काय आहे, हे तिला फारच उशिरा कळतं.

प्रिया बापटने सावि उत्तम रंगवलीय. दहावीतली मुलगी ते पंचवीसेक वर्षांची मुलगी असा साधारण तिचा प्रवास आहे. गौरी देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेली स्वतंत्र विचारांची नायिका तिने झकास साकारलीय. तिचं म्हणणं पटत जातं पाहताना, इतका इमोशनल अत्याचार आपण आजूबाजूला पाहात असतो, क्वचित स्वत:ही तो करत असतो. याची दुसरी बाजू अमला तिला दाखवून देते, तीही पटणारीच अर्थात. मराठी चित्रपटांतून अशी नायिका विरळाच. आजच्या स्त्रीवादी युवावर्गाला ही नायिका आवडेल. यात साविचं स्वतंत्र असणं, सडेतोड बोलणं, भावनांच्या गुंत्यात न अडकणं, रामला आवडत असतं. परंतु, जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा काय? ही कथा आहे फार जुनी. तीसेक वर्षांपूर्वीची असेल. तरी आजही असा विचार करणाऱ्या व्यक्ती, स्त्रिया किंवा पुरुष, कमीच दिसतात अासपास.

मुक्ता बर्वेला यात फारसे संवाद नाहीत, पण ती डोळ्यांतनं जबरदस्त बोललीय. किरण करमरकरांनी बापाची वेगवेगळी रूपं चांगली उभी केली आहेत. आरती वडगबाळकरचा अभिनय अगदी सहज असा. भूषण प्रधानही छोट्याशाच भूमिकेत भाव खाऊन गेलाय.

कोल्हापुरातलं सरदेसाईंचं भलंमोठं घर सुरेख आहे, त्याचा वापर दिग्दर्शिकेने उत्तम केलाय. मुंबईतलं साविचं घरही तिच्या व्यक्तिरेखेला अगदी साजेसं.

चित्रपटात एकच गाणं आहे. कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे... गुरु ठाकूर यांनी लिहिले असून त्याची रचना मंगेश धाकडे यांनी केली आहे. वैशाली माडे यांनी ते गायले आहे. गाण्याचे शब्द छान आहेत, या दोघींच्या नात्याचे कंगोरे उलगडून दाखवणारे.

चित्रपटाचा कालावधी १४० मिनिटांचा आहे. तरीही ताे कंटाळवाणा होत नाही हे महत्त्वाचं.

खुसपट काढायचंच तर.. पहिल्या भागातला काळ स्पष्टपणे लक्षात येत नाही. सत्तर, ऐंशी की, नव्वदचं दशक सुरू आहे, हा प्रश्न मला पडला. साविचे कपडे, तिच्या घरातलं वातावरण, बो टाय लावलेला बटलर, यांनी अंमळ गोंधळात पडले खरी. दुसऱ्या भागात हा प्रश्न पडत नाही, कारण तो नि:संशय आज आहे, २०१८.

सबटायटल्स काही ठिकाणी फारच गंडलीत. उदा. तू येतेयस ना? या वाक्याचं भाषांतर you coming naa? असं झालंय.

पण कोल्हापुरातल्याच भाषेत म्हणायचं तर, चालतंय की.

Comments

Post a Comment