माझे ‘मटा’चे दिवस

परवा रविवारी महाराष्ट्र टाइम्सच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त काढलेली विशेष पुरवणी वाचली नि माझे मटातले दिवस आठवले. जेमतेम दीड वर्षाचा, तोही इंग्रजी दैनिकातला, पत्रकारितेतला अनुभव पाठीशी घेऊन मी जानेवारी 1994मध्ये मटात रुजू झाले तेव्हा गोविंद तळवलकर संपादक होते आणि कुमार केतकर कार्यकारी संपादक होते. प्रकाश अकोलकर हे हाडाचे वार्ताहर तेव्हा मुख्य वार्ताहर होते. शिवाजी सावंत, यांना आम्ही सगळे शिवाजीराव म्हणत असू, वृत्तसंपादक होते तर सध्याचे संपादक अशोक पानवलकर वरिष्ठ उपसंपादक होते. प्रवीण टोकेकर, अभिजित ताम्हाणे, मुकेश माचकर, आशा कबरे मटाले, संजय ढवळीकर, इब्राहीम अफगाण, उमेश करंदीकर, तुषार नानल, सारंग दर्शने, राजेंद्र फडके, रोहित चंदावरकर असे आम्ही डेस्कवर काम करत असू. म्हणजे उपसंपादक होतो. आमचा वयोगट साधारण 23 ते 28 होता.

आमची सिनिअर मंडळी होती अनिल डोंगरे, प्रमोद भागवत, संजीव लाटकर, दिवाकर देशपांडे. हे डेस्कवर. रिपोर्टिंगला अकोलकर, संजीव साबडे, प्रताप आसबे, नरेंद्र पाठक, श्रीकांत पाटील, समीर मणियार, प्रभाकर नारकर आणि प्रतिमा जोशी. अशोक जैन सीनिअर पण एकदम ग्राउंडेड, सर्वांशी गप्पा मारणारे. दरम्यान गोव्याहून बदली होऊन गिरीश कुबेर आला होता.

रविवारला आ. श्री. केतकर, आल्हाद गोडबोले आणि श्रीराम शिधये. कमलाकर नाडकर्णी नाटकाचं पान पाहायचे. नीला उपाध्ये उर्फ बाई रोव्हिंग कॉरस्पाँडन्ट. सतीश कामत, हेमंत देसाई संपादकीय पान पाहायचे. रमाकांत दादरकर उर्फ रमा उर्फ दद्दू प्रॉडक्शन इनचार्ज. त्याच्याशिवाय आमचं पान हलत नसे. त्यामुळेच अभिजीतने बहुधा त्याच्या कॉम्प्युटरवर वॉलपेपर केला होता, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गब्दुल्ल्या आणि सदा हसतमुख मिहीर खडकीकर आणि एकदम देखणा गोराचिट्टा केशव पाटणकर हे मिलिंद कोकजेंबरोबर इंटरनेट एडिशनचं काम पाहायचे. निवतकर, उके, उदय, बडा कदम हा शिपाईवर्ग. आणि अत्यंत महत्त्वाचे संपादकांचे स्वीय साहायक सदानंद उर्फ इंग्लिश मोरे. त्यांचं नाव इंग्लिश मोरे कारण ते मराठीऐवजी इंग्रजी अधिक बोलत. ही यूज्ड टु रीड द दासबोधा!

कॉमर्स डेस्कला दोघंच, विश्वास डिग्गीकर आणि जॉन कोलॅसो. डिग्गीकर बातमी डिलिट होईल या भीतीखाली सतत असत. त्यांच्या कीबोर्डवरच्या कंट्रोल आणि एस या कीजवरची अक्षरं पुसली गेली होती. त्यांनी एका पावसाळय़ात एक भलीमोठी छत्री आणली होती. तीनचार माणसं मावतील एवढी होती ती. नाडकर्णी ती छत्री हातात घेऊन कुटुंब छत्री म्हणत ऑफिसभर फिरत.

शेवटी राहिले क्रीडा विभागातील सहकारी. पन्नाशी उलटली तरी ज्याला जग अरेतुरे करतं तो शरद कद्रेकर, जग इकडचं तिकडे होवो, गणपतीचे 15 दिवस कोकणात जाणारा संजय परब उर्फ बाबी, चंद्रशेखर संत आणि मी असताना सुरुवातीचा काळ असणारे विविक. मी वर्षभर या डेस्कलाही काम केलं, संत काही फारसे खूष नव्हते त्यावर. इंग्लंड विरुद्ध भारत महिला क्रिकेट सामना कव्हर करायला लखनऊलाही गेले होते त्या काळात.

त्या काळात मटात संपादकीय विभागात संगणक आलेले नव्हते. फक्त बातमी कम्पोज करण्यापुरते संगणक होते आणि ती कम्पोज करणारे ऑपरेटर वेगळे. वार्ताहर आणि उपसंपादक हाताने बातम्या लिहून काढत. त्यामुळे सगळय़ांच्याच हस्ताक्षरांचे पोस्टमॉर्टेम खुलेआम होई. तुषार नानल, पानवलकर, आशा, मुकेश, श्रीकांत पाटील, समीरभाऊ यांचं अक्षर छान होतं. वाचायला सर्वात कठीण होतं पाठकांचं अक्षर. अनुस्वार सहसा पुढच्या अक्षरावर. पण बातमी एकदम चोख. लाटकरांच्या शिफ्टला असलं की ते तिन्ही उपसंपादकांनी अनुवाद केलेल्या बातम्या आपापसात वाचायला द्यायचे आणि मग नुसती नजर टाकून कम्पोजिंगला पाठवायचे.

लिहिण्यासाठी कागदांची बंडलं येत. काही कागद एकदम गुळगुळीत आणि खूप चांगले असत. काही इतके खरबरीत की शाई फुटे त्यावर. मग कागद आले की आपल्यासाठी खास चांगल्या कागदांचा गठ्ठा काढून लपवून ठेवायचा. कधीतरी इकॉनॉमिक टाइम्समधनं गुलाबी कागद येत, ते आम्ही रोजच्या बातम्यांसाठी वापरत नसू. त्यावर रविवारच्या मैफलचा विशेष लेख छान उतरे.

पहिला कॉम्प्युटर आला तो आपांकडे. म्हणजे पानवलकर. त्यांचं लॉगिन आयडी होतं एपीए, आपा. म्हणून त्यांनी मी आपा म्हणू लागले ते आजतागायत. तसंच डोंगरेंचं. काही कारणाने त्यांनी मी अण्णा हाक मारत असे, सर्वांनीच ते नाव उचलले. मिहीर जॉइन झाला, लगेच आमचा सर्वांचा लाडका झाला. त्याच सुमाराला त्याच्या मोठय़ा भावाला मुलगी झाली, तो काका झाला. मग आम्ही त्याला काका म्हणू लागलो. आम्ही दोघं बऱयाचदा का कोण जाणे, गुजरातीत बोलायचो. आणि रोहितला त्याचा प्रचंड राग यायचा.

आपा तेव्हा मुंबई पान पाहात, पान क्रमांक 5. ते पान ते संगणकावर लावू लागले. त्यातून अभिजीतने स्फूर्ती घेतली आणि त्यानेही थोडय़ाच काळात संगणकावर मास्टरी मिळवली. रिस्टार्टच्या बटणाच्या आधाराने मी संगणक शिकलो, असं तो म्हणायचा. 1998च्या सुमारास आम्हाला सर्वांनाच संगणक मिळाले. मराठी टायपिंग शिकायला अनेकांनी बराच वेळ घेतला, त्याविरुद्ध खूप आरडाओरडा केला. पण भारत स्वत: तेव्हा संगणकावर टाइप करायचा, त्यामुळे या निषेधातली हवा कमी झाली.

आश्री आणि गोडूबाबा अगदी हळू बोलणारे. पण खास पुणेरी फटका असायचाच बोलण्यात. तो थोडाफार मुकेशमध्येही होता. अभिजीत तेव्हाही कमीच बोलायचा आणि जे बोलायचा ते फार कमी जणांना कळायचं.

1994।95मध्ये मटात मैत्रीण नावाचं पान सुरू केलं, खास महिला वाचकांसाठी. दर बुधवारच्या अंकात शेवटचं पान ते असायचं. मी, आशा आणि प्रतिमा ते सांभाळायचो. त्याच्याचसाठी दुर्गाबाई भागवत खमंग हा स्तंभ लिहीत, तो लिहून घ्यायला मी त्यांच्या घरी मुंबई सेंट्रलला जाई. वर्षभरात 15 वेळा तरी मी त्यांच्याकडे गेले असेन. दरवेळी त्यांचा फेवरिट ऑरेंज पिको टी प्यायला मिळे. खमंग सांगता सांगता त्यांनी मला क्रोशा विणायलाही शिकवलं होतं. त्यांनी विणलेला एक ब्लाउज त्यांनी मला दिलाय. शिवाय शिवणकामाचं साहित्य ठेवायचा छोटासा त्यांनीच शिवलेला बटवा. कधी संध्याकाळी त्या माझ्याबरोबर बाहेर पडत. साधी सुती नऊवारी साडी आणि पायात शाळेतल्या मुलींचे असतात तसे बक्कलवाले काळे बूट. रस्त्यातल्या झाडांची माहिती किंवा इतर काही सांगत त्या वेळी. मैत्रीणची आणखी आठवण म्हणजे नाडकर्णी दर मंगळवारी आम्ही पान लावत असताना ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’ हे गाणं म्हणून आम्हाला चिडवत.

केतकरांनी आमच्याकडे, म्हणजे आम्हा तरुण तुर्कांकडे, स्वतंत्र पानांचा कारभार सोपवला. तेव्हा मैफल वगळता कोणती पुरवणी नव्हती, पण शेवटचं पान फीचर्सचं असायचं. मग मुकेश चित्रपटाचं पान पाहायचा, अभिजीत कलेचं, जयंत पवार नाटकाचं. अभिजीतला तर केतकरांनी कलासमीक्षक असा स्वतंत्र दर्जाच देऊन टाकला होता. काही वरिष्ठांना हे सगळं फारसं आवडलं नव्हतं.

केतकरांची केबिन तेव्हा सर्वांसाठी गप्पा मारायला खुली असायची. म्हणजे माझ्या मुलीच्या शाळेचा आज पहिला दिवस होता, हेही मी उत्साहाने त्यांना सांगितलंय. आणि राजदीप सरदेसाई किंवा दिलीप पाडगांवकर यांनीही त्यांच्याशी तिथे बसून गप्पा ठोकल्यात. अगदी शिपाई वर्गसुद्धा केतकरांशी मोकळेपणाने बोलू शकत असे. 1996च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या वेळी शिपाई उदय जाधव आणि केतकरांमध्ये आदल्या रात्रीच्या मॅचवरून चर्चा रंगत असे. इतर कोणत्याही दैनिकात असे वातावरण नव्हते. त्यांनी तर एकदा आम्हा वीसएक जणांना कामाच्या दिवशी रीगलला ‘रंगीला’ पाहायला नेले होते, उर्मिलाच्या वडलांनी आमची तिकिटं पाठवली होती. 1998मधली गोष्ट आहे ही.

मटाचं ऑफिस त्या वेळी पहिल्या दिवसापासून होतं तसंच होतं. एसी नव्हता. अगदी सुरुवातीपासूनचा एक प्रचंड मोठा पंखा होता. फक्त संपादकांची केबिन एसी होती. टेबलं जुनी, खुर्च्यांचे खिळे बाहेर आलेले, हात तुटलेले. आम्हाला टाइम्सचं सावत्र मूल असल्यासारखं वाटायचं अगदी. एवढंच काय संध्याकाळी विश्वनाथ/जनार्दन/भीमा चहा आणि ब्रेडबटर घेऊन यायचे, त्यातही हा भेदभाव दिसायचा. तिसऱया मजल्यावर कँटीनमधनं जायचं काकडी, टोमॅटोच्या दोन स्लाइस घातलेलं सँडविच. आणि आमच्याकडे यायचे मार्गारिन लावलेले ब्रेड. पण एक होतं, चहा अगदी केव्हाही मिळायचा. तोही 25 पैशांत वगैरे.

कँटीनचं जेवण हाही एक लक्षात राहण्याजोगा प्रकार होता. गंभीर नावाच्या कंत्राटदाराकडे जेवणाचं कंत्राट अनेक वर्षं होतं, नुकतंच काही महिन्यांपूर्वी ते काढून घेतल्याचं कळल्याने टाइम्समध्ये काम केलेला प्रत्येक माणूस हळहळला.

आमची मॉर्निंग डय़ूटी असायची 9 ते 3. सकाळी यायचं, बॅग टाकायची की लगेच सहाव्या मजल्यावर कँटीनमध्ये जायचं. रोज सकाळी उसळ पाव असायचा. त्याची चव न्यारीच होती. मंगळवारी शिरा असायचा. भागवत चीफ सब असले की ‘सैन्यात शिरा’ या घोषणेशिवाय दिवस सुरूच व्हायचा नाही. दुपारी जेवणही साग्रसंगीत असायचं. पोळी, भात, आमटी, भाजी, दहीवाटी, केळं, उकडलेलं अंडं किंवा ऑम्लेट, सॅलड, पापड. तेही आठ आण्यात. नंतरनंतर चायनीज वगैरे सुरू झालं होतं. आम्ही घरच्या पोळय़ा न्यायचो कारण कँटीनमधल्या पोळय़ाच थोडय़ाफार तक्रार करण्याजोग्या असायच्या.

संध्याकाळी नाश्ता. त्याचे वार ठरलेले. बुधवारी मसाला डोसा असायचा, तेव्हा शिवाजीरावांकडून ‘एमडी’ खायला चला, असा आदेश ठरलेला. शिवाजीरावांना असे शॉर्ट फॉर्म्स करायला आवडायचं. दिवाकर देशपांडय़ांना ते डीडी म्हणायचे, मुकेश माचकरला मामु. मी नुकतीच जॉइन झाले होते तेव्हाची गोष्ट. भडोचची काहीतरी बातमी मी अनुवाद केली होती आणि गावाचं नाव लिहिलं होतं भरुच. दुसऱया दिवशी आल्या आल्या त्यांनी शिपायाकरवी आदल्या रात्रीच्या कॉप्या काढल्या, माझं अक्षर बघितलं. मी संध्याकाळी ऑफिसला आल्याआल्या विचारलं, शाळेत भूगोल नव्हता का. मला काहीच संदर्भ लागेना. तेव्हा त्यांनी माझी चूक सांगितली. माझं लॉजिक साधं होतं, आडनाव भरुचा असतं, मग गावाचं नाव भरुच असणार! अशी सार्वजनिक चूक सांगणारे दुसरे ज्येष्ठ म्हणजे भागवत. पिशवी हा शब्द कुणी पीशवी लिहिला की भागवतांचा आवाज ऑफिसभर घुमणारच, पी..श..वी. बिशाद तो शब्द चुकीचा लिहायची. भागवतांनी जेवढे प्रयत्न प्रशिक्षणार्थ़ींना शिकवण्यासाठी केले तेवढे क्वचित कुणी केले असतील.

कधीतरी आराममधून आम्ही वडापाव मागवत असू. केतकरांना तेव्हा विचारावे लागे, कारण त्यांना वडापाव अतिशय प्रिय. अजूनही. त्यांचा दिवसभर चहा आणि सिगरेटचा रतीब चालू असे. कधीतरी तेही आमच्यासोबत कँटीनला येत. दुपारच्या जेवणाला जैन, शिधये आणि डेस्कवरची सगळी मंडळी. जेवून झालं की मस्त ढेकर देऊन शिधये म्हणत, ‘चला, अर्ध्या तासाची निश्चिंती झाली.’ आमच्या आधीच्या काळात, बहुधा नरोन्हा छोटी रवी आणत. कँटीनमध्ये मिळणारं दही ग्लासात काढून ते घुसळून ताक करून पीत. त्यांना म्हणे तळवलकरांनी एकदा ताकीद दिली होती. पानवलकर छोटय़ाशा डबीतून तूपसाखर आणत हे आठवतंय. कधीतरी पालघरचा वार्ताहर नरेंद्र पाटील जवळा करून पाठवायचा, ती दिवाळीच. रमजानच्या महिन्यात समीरभाऊ खास सर्वांसाठी अफलातून आणायचा. त्यात खूप तूप असायचं पण चव अप्रतिम. अभिजीतचा डबा म्हणजे एक प्रकरण असे. त्याच्या आईने केलेलं खास सीकेपी आंबट वरण तो रोज आणायचा. सकाळी घरून निघायचा तो रात्री डबा खाईपर्यंत अनेकदा ते खरोखर आंबलेलं असायचं. अभिजीत ब्रेडही खायचा तो मधला, बाजूच्या कडा काढून टाकायचा.

रात्रीची डय़ूटी असली तर बऱयाचदा डबा आणणं सोयीचं जाई. कामाच्या घाईत वर जायला वेळ होत नसे. मग मुकेशच्या घरी स्वयंपाकाला येणाऱया भिडेकाकूंची स्पेशल भाजी, किंवा त्याने केलेली भेंडी फ्राय, बोंबील, कैरी घातलेली कोलंबी, भरली वांगी, भागवतांची एखादी विशेष डिश असली की जेवण मस्त होई. आहाहा... प्रेस क्लब जरा सुधारला तसं कधीतरी तिकडून खाणं मागवायचो. फोडणीचा भात एकदम स्पेशल असायचा. शुक्रवारी दिवसभरात ‘आज बसायचं का’ हा प्रश्न ऐकू आला नाही, असं व्हायचंच नाही. दोनचार जणांचं ठरलं की रात्री कामं पटापट आवरून सगळे जण प्रेस क्लबकडे जात. पण शुक्रवार वगळता क्वचितच तिथे कोणी जाई.

मी लागले तेव्हा बाई, प्रतिमा आणि आशा तिघीच बायका होत्या. तळवलकरांचा बायकांना नोकरी देण्याकडे फारसा कल नव्हता. बाई त्यांच्या धडाडीने टिकून राहिल्या होत्या. आणि नंतर तळवलकरही काहीसे निवळले होते. काहीसेच. त्यांच्या फेअरवेलची पार्टी झाली होती कूपरेजच्या टेनिस क्लबवर. साधारण नऊच्या सुमारास, पार्टी रंगात असतानाच, मी निघाले. त्यांना सांगायला गेले, घरी जायला उशीर होईल, मी निघते. तर म्हणालेच, म्हणून मला बायकांना नोकरी द्यायला आवडत नाही.

पण आम्ही कोणीच याचा बाऊ केला नाही. मी आणि आशा दोघीही नाइट करायचो. तेव्हा नाइट होती आठ ते दीड. त्यानंतर आम्ही तिसऱया मजल्यावरच्या रेस्टरूममध्ये झोपायचो. सकाळी उठून घरी. एकदा मी खूप गाढ झोपले आणि सकाळी नऊच्या सुमारास बाहेर पडत होते तर जिन्यात समोरून साक्षात आर. के. लक्ष्मण. ते नऊच्या ठोक्याला येत, बऱयाचदा त्यांचा टाइम्समध्ये वार्ताहर असलेला मुलगा श्रीनिवास उर्फ श्रीनी उर्फ टिकरीही असायचा. बाई तर रात्री 11शिवाय बाहेरच पडत नसत. बाई ऑफिसात असल्या की धमाल असायची. आसबे किंवा शिधयेंना विशेषत: त्या चक्क टोण्या म्हणून हाक मारायच्या. शिपायांना धारेवर धरायच्या. आमच्याशी प्रेमाने वागायच्या. कँटीनच्या मुलांशी तर त्यांचं फार सख्य होतं. आसबेंचा आवाज खणखणीत, बोलण्याला खास सोलापुरी ढब आणि त्यांचा एकूण रुबाब पोलिसासारखा होता. त्यांच्यासारख्याला बाई टोण्या म्हणतात, याचं म्हणून अधिक कौतुक. आता एनडीटीव्हीवर असलेली प्रियांका काकाडेकर तेव्हा टाइम्सला होती. काही विशेष राजकीय घडामोडी असल्या की ती संध्याकाळी आसबेंना येऊन भेटायची आणि बातमी समजून घ्यायची.

माझं सख्य जुळलं ते आश्री, गोडुबाबा, अकोलकर, पाठक, डोंगरेअण्णा, तुषार, मुकेश, ढवळीकर यांच्याशी. आसबे म्हणजे माझे मानसपिता किंवा मी त्यांची मानसकन्या. मला मुलीसारखं वागवत पण अहोजाहो करत.

भारतकुमार राऊत आले 1999मध्ये कार्यकारी संपादक म्हणून. सुरुवातीला जरा तोऱयात होते, ‘तुमच्या सगळय़ांची कुंडली माझ्याकडे आहे,’ अशी धमकी त्यांनी आम्हाला दिली होती. पण नंतर ते निवळले आणि आम्हा सर्वांशी त्यांची मैत्री झाली, ती आजही आहे. 9/11 घडले तेव्हा भारतनीच प्रथम त्यांच्या केबिनमधल्या टीव्हीवर ती बातमी पाहिली आणि बाहेर येऊन आम्हाला सांगितली. मटात येण्यापूर्वी ते अमेरिकेत होते, त्यामुळे त्यांना मोठाच धक्का बसला होता.

24 डिसेंबर 1999. इंडियन एअरलाइन्सचं विमान अपहरण करून काठमांडूहून कंदाहारला नेलं होतं तो दिवस. मी, अभिजीत आणि अण्णा नाइटला. तेव्हा टीव्ही नव्हता सतत बातम्यांचे अपडेट द्यायला. पीटीआयवर छोटे छोटे टेक येत होते आणि आम्ही दोघं मिळून बातमी करत होतो. रात्री साडेबारा एकपर्यंत आम्ही बातमी अपडेट करत होतो.

धीरुभाई अंबानी गेले तेव्हाचा प्रसंग आठवतोय मला. तोपर्यंत मोबाइल आले होते. मिहीर एकटाच ऑफिसात होता, मुकेश रात्रपाळी संपवून ट्रेनने घरी निघाला होता. मिहीरने त्याला कळवलं, मुकेश परत ऑफिसला गेला, बातमी केली. त्यांची पानभर जाहिरात तयारच होती कारण ते बरेच दिवस आजारीच होते. त्यामुळेच इतक्या रात्री बातमी येऊनही दुसऱया दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये रिलायन्सची पानभर जाहिरात छापून येऊ शकली.

आम्हा सगळय़ांचे मराठी भाषेवर प्रेम होते आणि काम करण्याचा उत्साह मोठा होता. बातम्यांचे इंग्रजीतून अनुवाद करताना एकाएका शब्दावर खूप चर्चा व्हायची. खूप चांगली पुस्तकं त्या काळात एकमेकांना दिलीघेतली आणि वाचली. सर्वांचं वाचन खूप होतं. नाइट डय़ूटी तेव्हा रात्री दीडपर्यंत असायची. तेव्हा खूप गप्पा रंगायच्या. त्या वेळी जमलेले हे मैत्र आजही कायम आहे. कधीही भेटलो तरी मागील पानावरून पुढे सुरू अशा गप्पा रंगतात.

मधली दोनतीन वर्षं खूप वाईट गेली होती. श्रीकांत पाटीलला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला आणि काही महिन्यांतच तो गेला. पाठकांना हार्ट अटॅक आला, त्यातून ते वाचले. आपांना कानाचं मोठं दुखणं झालं. सुरेशचंद्र वैद्यांना मोठी दुखापत झाली. सर्व जण खूप निराश झाले होते. केतकर तेव्हा गमतीत म्हणाल्याचं आठवतंय, सत्यनारायण करायला मी तयार आहे पण हे सगळं थांबू दे.

बटाटेवडा/सिगरेट/चहा आणि आठवडय़ातले दोन उपास हे कॉम्बिनेशन काही पाठकांनी सोडलं नाही आणि अखेर ते गेले. भागवतांनी नागपूरला बदली झाल्यावर टाइम्ससारख्या बडय़ा धेंडाशी पंगा घेतला, अखेर नागपूरला जॉइन झाले. पण वर्ष दीड वर्षातच अपघातात गेले. राजेंद्र गेला खूप तरुण वयात. मधे शिवाजीरावही गेले.

केतकरांनी 2001मध्ये राजीनामा दिले आणि ते अमेरिकेला गेले अनेक महिन्यांसाठी. 2000च्या डिसेंबरमध्ये राऊत संपादक झाले होते. 2001मध्ये केतकरांच्या उपस्थितीत पहिला मटा सन्मान सोहळा पार पडला.

हळूहळू करत खूप जण मटातून बाहेर पडले. सध्या तर फक्त सारंग आहे आमच्यापैकी तिकडे. आमच्या बॅचच्या अनेकांच्या नावामागे संपादकपद लागले, ही आनंदाची गोष्ट. आम्ही सगळे योग्य वेळी योग्य ठिकाणी एकत्र होतो, हेच खरं. तसं वातावरण दुसऱया कोणत्याही वृत्तपत्राच्या कार्यालयात नव्हतं. तो मोकळेपणा, तडफेने काम करण्याची वृत्ती वेगळीच होती. थोडा वयाचाही भाग होता म्हणा त्यात. तसंच टाइम्समध्ये काम करत असल्याने आमचे पगारही इतर पत्रकारांपेक्षा चांगले होते. आम्ही जाहिराती अनुवाद करून भरपूर पॉकेट मनी मिळवत असू. खेरीज नाइटचे आणि अवतीभवतीचे पैसे रोख मिळत. जे पुरुष सहकारी पगार बायकांच्या स्वाधीन करत त्यांच्यासाठी हा रोख पैसा आधाराला असायचा. आता आम्ही सगळे जरी एकत्र आलो तरी ती जादू पुन्हा अनुभवायला मिळणार नाही.

1999मध्ये मुंबई टाइम्स सुरू झाला आणि वातावरण बदलू लागलं. अचानक सगळे सीनिअर सर आणि मॅडम झाले. आम्ही कुणालाच कधीच सर म्हटलं नाही. वरिष्ठांना अहो आणि समवयस्कांना अरे तुरे करण्याचाच आमचा जमाना होता. आता आम्हीच सर/मॅडम झालो. 2003मध्ये मीही डय़ूटय़ांमुळे तब्येतीवर परिणाम झाल्याने नोकरी सोडली.

सीएसटी स्थानकासमोर ऑफिस असल्याने आसपासचा परिसर आम्ही वेळ मिळेल तसा पिंजून काढायचो. क्रॉफर्ड मार्केटमधला परशुराम फळवाला, स्टर्लिंग, मेट्रो, एक्सेलसिअर, रीगल वा इरॉसला सिनेमा, क्रॉस मैदानावरची प्रदर्शनं, फॅशन स्ट्रीटवरची खरेदी, आराममधला बटाटेवडा, कॅननजवळच्या खाऊगल्लीतला डोसा आणि चीज कॅप्सिकम टोस्ट, टाइम्सच्या इमारतीसमोरच्या भेळवाल्याकडची सुकी भेळ, नंतर कधीतरी प्लॅनेट एम सुरू झाल्यावर तिकडची कॉफी आणि वॉलनट ब्राउनी, मांसाहारी सहकाऱयांसाठी पोलिस कँटीन, लाइट ऑफ एशिया, कधी पंचम पुरीवाला, बोराबाजारातील शेवपुरी, तिकडचा कोल्हापुरी चप्पलवाला, या सगळय़ा आवडीच्या जागा.

एकुणात आयुष्यातली खूप सुंदर वर्षं मी मटात घालवली. ती फार कमी लोकांना अनुभवायला मिळतात अशी होती, म्हणून मी भाग्यवान.

Comments

  1. वाचायला फार मज्जा आली!

    ReplyDelete
  2. आठवणी दाटतात....

    ReplyDelete
  3. एक वेगळं perspective. वाचून छान वाटलं !

    ReplyDelete
  4. तुमचे म.टा.मधील दिवस वाचताना मला माझे म.टा. मधील दिवस आठवले ! माझ्या आयुष्यातील ते सोन्याचे दिवस होते!...थोरामोठ्यांच्या सहवासात आम्हाला परीस स्पर्श झाला.

    -- सुभाष नाईक (१९७७ ते १९८२ म.टा. मध्ये उप संपादक - वार्ताहर होतो.)

    ReplyDelete
  5. there are two small errors. 1. hemant desai was in charge of commerce page in 94. 2. the buttermilk guy was not naronha, it was Bendre. thank you prakash akolkar for the corrections. and thank you shweta, DD, Subhash naik.

    ReplyDelete
  6. i have forgotten to add some people. Dhananjay godbole who was the nagpur correspondent and suresh bhatewara who was the Nashik correspondent. both are still close friends of mine. haven't mentioned anyone among the operators/compositors/pasteup men, foremen, etc. but they were great guys to work with. also Ganacharya, umesh joshi, shedge, poyrekar...

    ReplyDelete
  7. Yes, great memories... undoubtedly that was the golden time of my career. Everybody and everything there during that period taught us something or the other. Mrinmayee, one observations disturbs me too. Nowadays Sir and Madam have become so common, We never called sir to Talwalkar and Ketkar and Bharat, but we respected them a lot, at the same time had frank relations/understanding with them. After reading your article I felt like going there and spending some time, but I'm sure that environment won't be there. Very few are working there now along with whom I worked in 90's. Its better to preserve those priceless memories of those golden days.

    ReplyDelete
  8. DEAR MRINMAYEE, it was a joy to re-visit the past.. I thought, even few sour memories also ripe as time flows and become sweet and honey. U should have written more. U rightly said, I am the only one of the GANG stayed back. Taking this opportunity may i express my deep gratitude about all of u. After terrible accident i could see this day, because of u all. Umesh, Mukesh, Abhijit, Asha, Mrinmayee, Rajendra, Sanjay, Prabhakar, Shrikant, Ibrahim, Pravin, Sanjeev, Chandoo... Oh, Te no hee divasaa gataa.. Just, flashed an idea- if all of us write a piece, a good book cud be produced... isnt it? that may not be just yade milad.. but even analytical.. And all Editors write for it..BTW, Mrinmayee has dn a gr8 job. A small kissa, when the hirstoric earthquake shattred marathwada, that morning after night-duty we 4-5 Mataians were roaming in Dhed Galli, under the leadership of Rajendra. It was for buying leather shoes on road.. The great Foras Road was just stone's throw away.. Mukesh and Ibrahim may correct the details.. But after that all Brigade came to office early. And our issue was remarkably superior. Nest day, Talwalkar put a brief, B and W letter on board to congratulate all. Elders said, that was unprecedented!

    SARANG SHANTANOO DARSHANE

    ReplyDelete
    Replies
    1. धेड गल्लीत ते गेलेच नाहीत... तिथे पहाटे जायचे असते. तरच बुटाचे बार्गेन मिळते. (माझ्याकडे नुकतेच घेतलेले शूज होते आणि मी उगाचच्या उगाच राजेंद्र फडके च्या कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार (तोही स्वतः पुरता) घालायचो) एकट्या मुकेशला त्या पहाटे भूकंप जाणवला. आम्ही त्याला वेड्यात काढत असतानाच पहिला फोन वाजला. तो मुकेश ने घेतला. दुसराही , तिसराही... सत्ताविसावा... त्रेचाळिसाव्वा... एव्हाना मुकेश कडे "महाराष्ट्रभर भूकंपाचे हादरे... " अशी कॉपी तयार झाली आणि त्याच वेळी ,
      भूकंपाचे केंद्र किल्लारी असल्याचा "टेक" तेव्हाच्या टेलिप्रिंटर वर आला.
      तोवर, धेड गल्लीत बूट मिळण्याची -- म्हणजेच पहाटे साडेपाच पर्यंतची- वेळ टाळून गेली होती. कुणालाच मूड देखील नव्हता.
      त्या संध्याकाळी, या भूकंपाला "प्रलयंकारी असा शब्द सारंगने (माझ्या आठवणीप्रमाणे त्यानेच) योजला.

      Delete
  9. wonderful trip down memory lane. these 7 years in my 37 years journalism career were really THE BEST and unforgettable. you are one of these 'golden colleagues.'
    Alhad Godbole

    ReplyDelete
  10. yes wachayala kharech chhan watale.great team hoti.

    ReplyDelete
  11. Excellent memories......... you literally took us back in time machine !!
    Beautiful narration Mrin.. Keep it up :)

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. मृण्मयी'ज आय व्ह्यू ! -- आणि तिची नजर बर्यापैकी तेज आहे (बर्या वर रफार आला... इन-डिझाईन का काय ते गूगल मधेही असते की काय? ) - अशा आठवणी संपत नाहीत. फक्त एक खरेच बरे आहे की आपण सगळेच जण वाढलो. त्यामुळे, वेळीच विभक्त झालेल्या कुटुंबातील भावंडे जशी गोडीत असतात तसे आपले होऊ शकले. आशा, ढवळीकर, रोहित हे मला गेली कैक वर्षे न दिसलेले लोक... मला आता उमेश परत भेटलाय आणि इब्राहीमची खुशाली अगदी डेली बेसिस वर देखील कळू शकते. मुकेश दररोज भेटायचा ... टोकेकर काही महिने भेटलेले नाहीत. स्याम कार्व्हर शी आजही "एकत्र फिरायला जाउ"च्या आणा-भाका होतात... आणि ऐन वेळी कुणीतरी बेदर्दी होतो. yet,
    मृण्मयीने जे - कुठल्याही वेळी भेटलो तरी मागील पानावरून पुढे हे वर्णन केले आहे ते शब्दश: खरे आहे (अक्षरश:, चक्क, ठप्प हे शब्द मी आज देखील वापरत नाही.) "अक्षरश:" हा शब्द ज्यांना एकट्याला माफ होता, त्या एका अक्चुअल व्यक्तीने मृण्मयीचा हा आठवण-लेख मला ईमेल ने पाठवला पण शेवटी आलोच इथवर.

    बाकी भेटू तेव्हा बोलूच.
    पण खूप चांगले याचे वाटते की,
    Professionalism आणि Committment या दोन गोष्टी "पिवळा पितांबर" सारख्या एकार्थक असण्याचा एक काळ होता, it was a time when a journalist's excellence was measured by journalistic yardsticks and masquerades (MBAs, barbies , politicians et al) were yet to enter the scene आणि त्याच काळात आपण सारेजण एकमेकांच्या साथीने अथवा स्पर्धेने वाढत होतो,
    वाट वेगळी झाली हे बरेच झाले. पण ती एकत्र होती याची आठवण वेल्हाळ असते. We almost grew up when " 20th century Journalism " was preparing for its exit . It ensured a safe , healthy and happy incubation for us, though!
    ***

    कुणी म्हणेल, after the turn of the century, अक्ख्या पत्रकारिता क्षेत्रालाच अपघात झाला आणि तो अटळ होता.
    पण ज्या अपघातातून सारे जण सहीसलामत बचावल्याची बातमी मला आजही बदामी रंगाच्या कागदावर लिहायला - किंवा थेट क्वार्क मध्ये ऑपरेट करायला आवडेल, तो हाच अपघात!
    आहात ना रे सगळे... ?

    ReplyDelete
  14. अभिजीत यास,
    मी, इब्राहीम आणि टोक्या तात्पुरते दगावलो आहोत... आता वेगळ्याच बेटावर एखादी सुवर्ण सुंदरी वारा घालून जिवंत करते की मैनेजमेंटी नव-पत्रकारितेची चप्पलच पुन्हा नाकाला लागते ते पाहायचे. अर्थात या बेटावरसुद्धा कालचक्र उलटे फिरू शकते.
    बाय द वे, त्या रात्री धेड गल्लीमध्ये जाणे झाले होते. बोगस बूट होते. तिथून पहाटे ऑफिसला आलो, झोपलो. धक्का जाणवला. मी असंख्य फोन घेतले. सगळे मुंबई परिसरातले. शिवाजी पार्कची एक वृद्ध बाई विचारत होती, कुठे काही हानी नाही झाली ना? मी देवाला प्रार्थना करायला बसले आहे. तेव्हा काहीच माहिती आली नव्हती. मी दिलासा दिला, तुमची प्रार्थना देवाने ऐकली, कुठेही प्राणहानी नाही. इथे झोप लागणार नाही, म्हणून गिरगावात खोलीवर जाऊन झोपलो ते दुपारपर्यंत. दुपारी जागा झालो तेव्हा ३० हजार भूकंप-बळीचा आकडा चालला होता. देवाच्या नावाने कचकचीत शिवी घालून ऑफिसकड़े निघालो.
    असो.
    मृण्मयी, बेंद्रेना, ते रवीने ताक घुसळत म्हणून रविशंकर म्हणायचे, असे जैनान्नी लिहिलय.

    ReplyDelete
  15. ABT, i didn't know about this dhedgalli prakaran as i was yet to join MaTa. thanks for that. and, i completely agree with you that we grew up together in a secure/challenging environment. reading all comments makes me want to organise a get together very soon. last time we came together was mukesh's kelvan.
    Mukesh, all the best for the new venture with ibu n tokya, the ultimate 'lonyatale pavte' i have met in my life.
    Akolkar also told me about bendre, thanks for that too.

    ReplyDelete
  16. Thanks for the great article. It is a superb nostalgic journey captured in equally emotional context. I was in school then, and knew all these names from 'Mata', an intellectual beacon for me those days. Those entire 8 years created a generation of readers and specially young readers just as they shaped the journalists. Just recently, I was sent the following article by someone, and found it very relevant to what Mrinmayee wrote about Mr Ketkar. The article is written by another Mata groomed journalist ' Girish Kuber' : http://www.insidemarathiuniverse.blogspot.in/

    ReplyDelete
  17. मृण्मयी, छान लेख आहे. तपशीलाच्या काही चुका इतरांनी लिहील्या आहेतच. मी, मिहीर आणि केशनबद्दलचा उल्लेख आहे तो वाचताना थो़डे गोंधळायला होईल म्हणून खुलासा करतो. वाचताना असा समज होतो की मी, मिहीर ९४-९५ मध्ये तळवलकर संपादक असतानाच इंटरनेट आवृत्तीकरता आलो. तसे नाही. इंटरनेट आवृत्ती केतकर संपादक झाल्यावर सुरू झाली आणि केतकरांनी त्याकरता मला बोलावीन घेतले. मी ९९ ला जॉईन झालो आणि २००० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आवृत्ती सुरू झाली तेव्हा मिहीर आणि केशव जॉईन झाले. अर्थात ९४ ते ९७ या काळात मी तिस-या मजल्यावर टाइम्समध्ये असल्याने रोज खाली मटात येचत असे. ९७ ते ९९ या काळात मी टाइ्म्सबाहेर असताना केतकरांकडे नेडमीच येत असे. तू उदय आणि केतकरांच्या फिफा फूटबॉलच्या चर्चेविषयी लिहीले आहेस. त्याचा मला आलेला एक अनुभव फारच ग्रेट होता आणि केतकरांच्या अत्यंत फ्रेंडली व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा होता. त्यावेळी फिफा सुरू असल्याने अनेक वर्तमानपत्रात विजेत्यांच्या अंदाजाच्या स्पर्धा सुरू होत्या. अश्याच एका स्पर्धेची प्रवेशपत्रिका उदयेने भरली होती. मी आणि इतर दोन, तीन जण केतकरांकडे बसलो असताना उधय आत आला आणि म्हणाला या स्पर्धेच्या फॉर्ममधले मी अमुक एक प्रॉडक्ट वापरतो कारण...... हे वाक्य पुरे करून द्या. माझ्या बरोबरचे कॉर्पोरेट क्षेत्रातले दोन मित्र अवाक होऊन बघत राहीले. केतकरांनीही आमच्याकडे बघत एक मिनिट हां म्हणून ते वाक्य पुरे केले आणि मला म्हणाले उदयला ओळखतो की नाहीस? फूटबॉलमध्ये बाप आहे. मग उद्याची मॅच कोण जिंकेल, कोण कसा खेळत आहे यावर त्याच्याशी पाच मिलिटे चर्चा केली. मला नाही वाटत कोणताही शिपाई संपादकांकडे जाऊन असे वाक्य पूर्ण करून द्या असे म्हणू शकेल. केतकरांच्या राजकीय मतांमुळे ते सोशल मिडीयावर सध्या हेटमेलचे धनी झाले आहेत आणि कवडीची अक्कल नसलेला कोणीतरी कालचा उटपटांग त्यांना (आणि नेहरूं, गांधीनाही) वाटेल त्या शिव्या घालतो. त्यांनी केतकरांच्या व्यक्तीमत्वाची हा सुंदर, सहज आणि मनमोकळी बाजूही लक्षात घेण्याची गरज आहे.
    मिलिंद कोकजे

    ReplyDelete
  18. I am commenting as an avid reader of MaTa from the first day in 1961, am in the USA since 1994 though still read it every day, more so after Internet edition became easily available and accessible. Kumar Ketkar has been a friend from college days and have known Govindrao while at Bombay Chamber and also Hemant.

    Vivek Date

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विवेक. तुम्ही या ब्लाॅगपर्यंत कसे पोचलात ते जाणून घ्यायला आवडेल.

      Delete
  19. हे ब्लॉगपोस्ट वाचायला फार मजा आली. खूपच ओघवत लिहिले आहे. मी वर्तमानपत्रात कधी काम केलं नाही. पण आता वाटतंय की करायला हवे होते. माझे मित्र शरद चव्हाणही अनेक वर्ष मटा मध्ये कामगार जगतावर लिहित असत. त्यांचे नांव मी तुमच्या ब्लॉगमध्ये शोधत होतो, पण दिसले नाही. पुन्हा एकदा सांगतो : तुम्ही फारच छान लिहिलंय.
    विवेक पटवर्धन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. शरद चव्हाण बहुधा नोकरी करत नव्हते म.टा.त, मी होते तेव्हा नव्हते नक्की.

      Delete

Post a Comment