तू एकटी नाहीस

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व वाचक सख्यांना शुभेच्छा. खरं तर म्हणजे काय, असा प्रश्न मलाही पडला आहे. पण अशी पद्धत झाली आहे हल्ली. दोन दिवसांपासून मोबाइलवर एसएमएस शुभेच्छांचा मारा सुरू आहे, वर्तमानपत्रांमधून रकानेच्या रकाने छापून येत आहेत. खेरीज अनेक विनोदही त्या निमित्ताने फिरतायत. एक दिवस महिलांचा, मग बाकीचे 364 (यंदा 365) तरी आमचे कुठे असतात, आम्ही आमच्या बायकांच्या अत्याचाराखाली कायमच किती दबलेलो असतो, असा दावा पुरुष करत असतात. इतर अनेक सणांचे झालेय तसा महिला दिनाचाही इव्हेंट झालाय. देशभरात सगळीकडे पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, मोफत वैद्यकीय शिबिरे, वगैरेंची रेलचेल असेल. एखादी विमानकंपनी फक्त महिला कर्मचारी असलेले विमान उडवेल. पण उद्या पुन्हा परिस्थिती जैसे थे असेल, यात शंका नाही. अशा विशिष्ट दिनांमुळे एखाद्या समस्येकडे लक्ष वेधण्यात यश येते, हे खरे असले तरी ते यश अल्पकालीन आणि मर्यादित असते, हेही तितकेच खरे.

साधारणपणे 1909पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे यंदाच्या महिला दिनाची थीम आहे, महिलांना सामर्थ्यवान करा - भूक आणि गरीबी हटवा. या दिवशी काही अतिरेकी पावलेही उचलली जातात. उदाहरणार्थ एका वर्षी लंडनमधल्या एका वाचनालयाने या दिवशी पुरुष सदस्य आणि पुरुष कर्मचाऱयांना वाचनालयात प्रवेशबंदी केली होती. या सगळय़ातून काय साध्य होते म्हणावे तर गेल्या 100 वर्षांत महिलांची जगभरातली परिस्थिती खरोखरच सुधारली आहे, हे स्पष्ट आहे. किमान स्त्राe आणि पुरुषांमध्ये समानता असली पाहिजे, हे तत्त्वत: तरी मान्य झालेले दिसते. हेही नसे थोडके!

आजच्या मधुरिमाची कव्हर स्टोरी मुद्दाम घेतलीय, चौसाळय़ासारख्या छोटय़ा गावातल्या एका मैत्रिणीने ती लिहिलेली आहे, याला खूप अर्थ आहे. त्यावरची तुमची मतं जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. औरंगाबाद, सटाणा, धुळे वा नाशिकमधल्या आपल्या मैत्रिणींनी मुद्दाम मांडलेल्या विचारांना मधुरिमामध्ये स्थान देताना अतिशय आनंद होतो. सगळीकडची स्त्री विचार करायला लागलीय, ती आपलं मत मांडायला कचरत नाहीय, हा त्याचा उघडउघड अर्थ आहे. तो मला खूप दिलासा देणारा आहे.

स्वातंत्र्य मागून मिळत नसतं, ते घ्यावं लागतं, हे एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाला जसं लागू होतं, तसंच महिलांच्या स्वातंत्र्यालाही. आपल्याला एकदा जाणीव झाली पारतंत्र्याची, इच्छा निर्माण झाली स्वतंत्र होण्याची, की हातपाय आपल्यालाच हलवावे लागतात. त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, विरोधातून वाट काढत काढत पुढे चालत राहावं लागतं. छोटी छोटी उद्दिष्टं/ध्येयं ठेवून नीट नियोजन करून वाट ठरवावी लागते. मुख्य म्हणजे तात्पुरत्या पराभवाने निराश न होता, मरगळ झटकून मार्गक्रमणा करावी लागते. या प्रवासातही एक नशा असते, एक धुंदी असते. कदाचित तो प्रवासच उद्दिष्टापेक्षा अधिक आनंद देणारा ठरतो.

आपण सर्वच जणी या प्रवासाला निघालेल्या आहोत. कुणी एकटी, कुणी दुकटी तर कुणाच्या सोबत खूप जणी. सर्वांचाच हा प्रवास आनंदाचा होवो, अशा शुभेच्छा. प्रवासात ज्या अडचणी येतील, त्यांवर मात करताना आपल्या मैत्रिणीला हाक मारायची लक्षात ठेवा. त्या अर्थाने आपण एकटय़ा नाही. होय ना?

८/३/१२

Comments