आह, सुटी...

मागच्या आठवड्यात मी चार दिवस रजेवर होते आणि घरापासून खूप लांब एकटीच फिरायला गेले होते. मुख्य म्हणजे मोबाइल नेला नव्हता सोबत. खूप भटकले, अनेक नवीन जागा पाहिल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांत बसले. घरच्यांशी सकाळी आणि जमल्यास रात्री ई-मेलवरून संपर्क ठेवला होता केवळ. बाकी दिवसभर माझी मी. जेव्हा परत आले ना मोठा प्रवास करून, काही तरी वेगळंच वाटत होतं. तुटल्यातुटल्यासारखं. भवतालाशी लिंक पुन्हा जोडायला अंमळ एक दिवस जावा लागला. एक दिवस आराम करण्यात, बॅग आवरण्यात, कपड्यांचं सॉर्टिंग करण्यात गेला. दुस-या दिवशी कामावर रुजू झाले. घरातून अर्थातच पाय निघत नव्हता. मधुरिमा, त्यातले नियमित स्तंभ, लेखक, माझं संपादकीय, ऑफिस हे सगळं कुठल्या तरी अपरिचित जगातलं वाटत होतं. अखेर निघाले, तासभराच्या सवयीच्या लोकलच्या प्रवासानंतर ऑफिसला पोहोचले, कॉम्प्युटर ऑन केला आणि एकदाची माझ्या ओळखीच्या जगात आले.

त्या दिवशी थोडी सुटीच्या धुंदीत, थोडी पुढे दिसणा-या कामाच्या ताणात, थोडी झोपेत होते; पण अखेर आलेच कायमची ताळ्यावर. सुटीबिटी सब झूठ है, असं वाटायला लागलं, इतकी अचानक रोजच्या रगाड्यात गुंतून गेले. आता वाटतंय, खरंच बाहेर कुठे गेले होते का मी? आणि हे रोजचं सगळं घरातलं/ऑफिसचं काम, कुटुंबातली माणसं, ऑफिसमधले सहकारी, लोकलमधल्या मैत्रिणी, ओळखीचा भाजीवाला, रोजचा रिक्षावाला, हे सगळं अख्खे चार दिवस नव्हतं माझ्या आयुष्यात? आणि माझा मोबाइल, तोही नव्हता खरंच सोबत? सकाळी आणि रात्री निवडक मित्रमैत्रिणींना जीएम आणि जीएनचा एसएमएस केल्याशिवाय चैन न पडणारी मी, मोबाइलशिवाय चार दिवस राहिले? पण खरं सांगू, मोबाइल नव्हता म्हणूनच मी सुटीचा आनंद खरा उपभोगू शकले. तो चालू असता तर तो जाणूनबुजून न पाहण्याइतका मनाचा खंबीरपणा माझ्याकडे नक्की नाही. दिवसातून एकदा का होईना, एसएमएस तरी केलेच असते अनेक!

तुम्ही सुटीवर जाता, खरं तर जाऊन परत येता, तेव्हा तुम्हालाही असंच होतं का हो?

Comments