टोमणा

एका शनिवारी रात्री आम्ही नेहमी जमतो तशा सोसायटीतल्या मैत्रिणी जमलो होतो. एक जण सासूशी भांडून आली होती कशावरून तरी. राग अजून कमी झाला नव्हता तिचा आणि कायकाय बोलतच होती. म्हणाली, ‘हे सगळं त्यांना ऐकवायचं होतं मला, पण तेव्हा सुचलंच नाही.’ यावर दुसरी पटकन म्हणाली, ‘असं माझंही होतं. त्या वेळी टाँट सुचत नाही आणि नंतर किती मस्त डायलॉग येत जातात डोक्यात. वाटतं तेव्हा आठवलं असतं तर बोलून टाकलं असतं, मग कसा झाला असता चेहरा?’ मलाही अर्थात असं ब-याचदा होतं. भांडताना किंवा वाद घालताना, मग ते सासूशी असो, नव-याशी, आईशी वा मित्र/मैत्रिणीशी, असा अनुभव तुम्हालाही आला असेल. मला वाटतं, आठवत नाही, सुचत नाही, तेच बरं आहे. तसंही शब्दाला शब्द लागून भांडण वाढतच जातं. मग गप्पच बसलं किंवा खूप टोचेल असं नाही बोललं तर भांडण लवकर मिटतं, असं वाटून गेलं मला आपलं. कारण असा जिव्हारी लागलेला टोमणा नंतर खूप काळ मनात राहतो आणि कधी ना कधी त्याचा संदर्भ समोरच्या व्यक्तीकडून येतोच. तोपर्यंत आपला राग निवळलेला असतो आणि एकदम स्वत:चीच लाज वाटते, असं कसं बोलू शकले मी, काहीच नाही वाटलं तेव्हा मला? माझं तर अनेकदा असंही होतं, की काहीतरी सुचतं बोलायला पण मी बोलत नाही. आणि एखाद्या वेळी एखादाच शब्द किंवा वाक्य निघालंच तोंडून की वाद झालाच समजा. किंवा एकदम अबोला. म्हणजे बोलताना माहीत असतं की असं काहीतरी होणार आहे, पण कंट्रोल जातोच माझा. नंतर वाईट वाटून काही उपयोग नसतो ना पण?

‘बहीणभावांचं मैत्र’ वाचून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात. एकाने लिहिलंय, मी जो काही आहे तो माझ्या दादामुळे. दुस-याने त्याच्या मैत्रिणीची आठवण सांगितलीय. तीन मुलींमधली ही मोठी. सर्वात धाकटी बहीण झोपेतून उठायची ती आई नव्हे तर ताई म्हणत. ‘आह सुटी’ वाचूनही अनेक मैत्रिणींनी लिहिलंय की अशी सुटी आम्हालाही घालवायला आवडेल. मोबाइल बंद ठेवल्याचं काही जणींना कौतुक वाटलं तर काहींना एकटीने केलेल्या प्रवासाचं.

Comments