पाऊस

ऑगस्ट संपायला आला, भाद्रपदही लागला, तरी पाऊस काही म्हणावा तसा झालेला नाही अजून. जूनमध्ये शास्त्रज्ञांनी केलेले सर्वसाधारण पावसाचे भाकीत खोटे ठरते की काय असे वाटू लागले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अजूनही मानले जाणारे ठोकताळेही काही फारसे आशावादी नाहीत. म्हणूनच आम्हाला वाटलं पावसावरच्या कविता, गाणी, अनुभव प्रसिद्ध केले तर ते वाचायला तरी तो येईल. ‘कोणाच्या कोंबड्याने का होईना, उजाडावं’ या म्हणीनुसार ‘कशाने का होईना, पाऊस यावा.’ म्हणजे मी गेले काही दिवस छत्री न घेता घराबाहेर पडते. पांढराशुभ्र सुती ड्रेसही घातला आणि छान चामड्याच्या कोल्हापुरी चपला. म्हणजे, मी भिजावं, निदान ड्रेस खराब व्हावा म्हणून पाऊस पडावा; पण नाही. 

एक आहे, श्रावणात अगदी श्रावणातल्यासारखा पडला बाई पाऊस मुंबईत. लख्ख ऊन असावं आणि मिनिटभरासाठी एक सर येऊन जावी, असं दिवसातनं तीनदा तरी झालं. अगदी रोज. नियम असल्यासारखं. श्रावण पाळला म्हणजे पावसाने, असंच म्हणायला हवं. तुम्ही-आम्ही पाळा अथवा न पाळा!

तसं पाहिलं तर मोठ्या शहरांमधल्या लोकांचं अस्तित्व काही पावसावर अवलंबून नसतं, जसं शेतक-याचं असतं. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो, ते त्याचं पुढचं सगळं आयुष्य त्यावर अवलंबून असतं म्हणून; पण तरीही अगदी मुंबईतला माणूससुद्धा पावसाची आतुरतेने का वाट पाहत असतो बरं? त्याच्या दृष्टीने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये पाऊस पडला तरी पुरेसा असला पाहिजे. म्हणूनच मला कधी कधी वाटतं, हे वाट पाहणं हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांपासून तर आपल्यापर्यंत आलेलं नाही? अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला न शिकवता येत असतात, तसंच हे पावसाची वाट पाहणं तर नाही?

पावसावरचे लेख वाचताना लक्षात आलं की पावसावर किती कविता, किती गाणी आहेत मराठीत. त्यातली काही खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत, जी आपण नेहमी वाचत वा ऐकत असतो; पण आपल्या फारशा वाचनात न आलेल्याही कविता आहेत खूप, ज्या या अंकातील लेखांमधून तुम्हाला वाचायला मिळतील. पाऊस जसा प्रतिभावान कलावंताला खूप काही सुचवून जातो तसाच सामान्य माणसालाही पाऊस कवित्व बहाल करू शकतो, हे या लेखांच्या भाषेतून, शैलीतून तुम्हाला पटेल.

सांगाल ना आम्हाला तुम्हाला काय वाटतं पावसाबद्दल ते?
मृण्मयी रानडे संपादक
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com

Comments