पानी पानी रे

जिकडेतिकडे दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या बातम्यांनी ती अस्वस्थ होऊन गेली. तिने जरी 1972चा दुष्काळ पाहिला नव्हता तरी पाणी नाही म्हणजे काय अवस्था होते ते तिला शहरात राहूनही चांगलंच ठाऊक होतं. वडील दुष्काळग्रस्त भागातले होते, त्यामुळे त्यांच्या तोंडून पाणी कसं निगुतीने वापरायचं, साठवायचं ते ती ऐकत आली होती. तिचे कोणी नातलग उत्तर प्रदेशात होते, त्यांनी एकदा सांगितलं होतं की, तिकडचे लोक अंघोळ खाटेवर बसून करतात. खाली पडलेलं पाणी निदान घराभोवतालच्या झाडांना घालता येतं, कपडे धुण्यासाठी वापरता येतं. एका मैत्रिणीने सांगितलं की घरातल्या बायका अगदी आवश्यक असेल तेव्हाच अंतर्वस्त्रं वापरतात, कारण ती स्वच्छ धुतल्याशिवाय चालत नाही. मग पाणी नसेल तर ती न घातलेलीच बरी. यामुळे ती आतून हलून गेली आणि तिनेही तिच्या परीने मुबलक पाणी असूनही पाणी वाचवायचे मार्ग शोधून काढले होते.

केव्हाही बटाटे, पालेभाज्या, फळभाज्या धुवायच्या तर वाहत्या नळाखाली न धरता पातेल्यात पाणी घेऊन धुवायच्या आणि ते पाणी घरच्या झाडांना घालायचं. पाहुण्यांसमोर ठेवलेलं पण त्यांनी थोडंसंच पिऊन उरलेलं, मुलांच्या किंवा स्वत:च्या पाण्याच्या बाटलीतलं उरलेलं पाणी संध्याकाळी घरी आल्यावर ओतून द्यायचं नाही. ते एका पातेल्यात ओतून ठेवायचं, ते पाणी दुस-या दिवशी झाडांना घालायचं. माठ धुतला की ते पाणीही कपड्यांसाठी वापरायचं. ड्रेस शिवायला टाकायच्या आधी कापड पाण्यातून काढून उरलेलं दुस-या दिवशी कपडे धुवायला घ्यायचं. असंच आणि काय काय. येताजाता कुठे वाहता नळ दिसला की तो बंद करणं तर आलंच ओघाने. हे सगळे उपाय अगदी छोटे आहेत, त्याने काही अख्ख्या देशाची पाण्याची गरज भागायला मदत होणार नाही, हे तिला ठाऊक होतं; पण त्याचबरोबर एवढं पाणी तरी वाचलं ना, तेवढाच आपला हातभार, असा विचार तिने केला होता. तुम्ही कसं वापरता पाणी? सावधपणे की बेजबाबदारीने? सांगाल ना आम्हाला?

Comments