कसे गेले पेपर ?

ज्यांची दहावी-बारावीची परीक्षा नुकतीच संपली आहे, त्यांना, त्यांच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना हा प्रश्न शंभर जणांनी तरी विचारला असेल गेल्या काही दिवसांत, कसे गेले पेपर? आता याची किती उत्तरं असू शकतात. छान, उत्तम, बरे, ठीक, वाईट, इत्यादी. बरं, वाईट गेले असले तरी तसं कोणी सांगणार नाही. उत्तम गेले असले तरी साधारणपणे मुलं म्हणतील, चांगले. हो, महिन्याभरात निकाल लागेल तेव्हा कळेलच ना कसे गेले होते पेपर ते? म्हणजे मुलं उत्तर काहीही देवोत, पेपर तपासणार्‍याकडे गेलेला असतो, म्हणतात ना ‘तीर तो कमान से निकल चुका था,’ त्या टाइपचं काही तरी. ज्या पालकांचं मुलांच्या अभ्यासात फार लक्ष असतं ते अगदी उत्साहाने बीजगणितात अमक्या प्रश्नाचं उत्तर अर्धंच झालं हो लिहून, रसायनशास्त्राच्या पेपरात तीन चुका होत्या चक्क, वगैरे टाइपची उत्तरं देतात.
दहावी-बारावीच्या परीक्षांचं महत्त्व अजून काही कमी व्हायला तयार नाही. काही वर्षांपूर्वी परीक्षा मंडळाने गुणवत्ता यादी तयार करण्याचं बंद केलं, त्यामागे हा मोठा हेतू होता की, परीक्षांचा/निकालाचा मुलांवर ताण पडता कामा नये; पण शिक्षणव्यवस्थाच अशी आहे की परीक्षांना, किंबहुना त्यात खूप गुण मिळवायला पर्याय नाही, हे मुलांना ठाऊक आहे. त्यामुळे हा उपाय काही लागू पडला नाही. ताणतणाव तसेच कायम आहेत, नंतर काय करायचं त्याबद्दलची संदिग्धता कायम आहे, त्यामुळेच पालकांचा ‘अभ्यास कर’चा धोशा कायम आहे. अभ्यासानंतर नोकरी मिळेल का, कुठे जावं लागेल, वगैरे तर खूप पुढचे प्रश्न; पण यामुळेच ज्या पालकांना आपल्या मुलांना सर्वसाधारणपणे, कोणताही तणाव न देता हसतखेळत वाढवायचं असतं त्यांना कधी कधी कळेनासं होतं की आपल्या मुलांनी करावं काय, त्यांना उत्तेजन कसं द्यावं, या व्यवस्थेला वळसा घालून पुढे कसं जावं की या व्यवस्थेपल्याडचा विचारसुद्धा अशक्य आहे? आहेत का आपल्याकडे काही उत्तरं याची? कळवाल ना आम्हाला?

Comments

Post a Comment