करावं असं खूप काही..

नवीन वर्षात आपण सगळ्यांनी, मधुरिमाच्या मैत्रिणी आणि मित्रांनीसुद्धा, करायलाच हव्यात अशा काही गोष्टी.

-रोज किमान एक वेळचे जेवण आरोग्यदायी घेणे.
-बाहेरच्या खाण्याचे प्रमाण आठवड्यातून एकवर आणणे.
-मोबाइल पूर्णपणे वापरायला शिकणे (म्हणजे निव्वळ आलेला कॉल करणे व घेणे वगळून).
-मोबाइलवर ई-मेल किंवा एसएमएस आलाय का हे मिनिटामिनिटाला पाहण्यापेक्षा त्यात किमान अर्ध्या तासाचा वेळ जाऊ देणे.
-घरी पोहोचल्यापासून दुस- दिवशी कार्यालयात जाईपर्यंत मोबाइल/लॅपटॉपचा कमीत कमी वापर करणे.
-मोबाइलवरून कमीत कमी बोलणे. शक्य असेल तिथे प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे.
-मोबाइलवर माहिती देणारे वा उपयुक्त (उदा. नकाशा) असे अ‍ॅप्स डाउनलोड करणे.
-आठवड्यातून किमान दोन दिवस कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यालयात न थांबणे -जेणेकरून घरी अधिक वेळ घालवता येईल.
रोज किमान एका वेगवेगळ्या मित्र/मैत्रीण/नातलगाला फोन करून गप्पा मारणे. प्रत्येकाच्या जीवनात अशा किमान 50 ते 60 व्यक्ती असतातच की ज्यांच्याशी बोलण्यासारखं खूप असतं, पण...
-रोज पुस्तकाची काही पाने वाचणे.
-रोज काही तरी लिहिणे. कागदावर पेन वा पेन्सिलने लिहा किंवा संगणकावर लिहिले तरी चालेल.
-दिवसभरात किती वेळा आपण कोणाला थँक यू, सॉरी किंवा प्लीज म्हणालो याची नोंद ठेवणे.
-दिवसभरात किती वेळा आपल्याला किती जणांनी थँक यू, सॉरी किंवा प्लीज म्हणाले याची नोंद ठेवणे.
-दिवसभरात किती वेळा चहा/कॉफी प्यालो, किती वेळा सिगारेट ओढली, किती वेळा अपशब्द वापरले त्याची नोंद ठेवणे.
-नवरा किंवा बायकोशी किमान दहा मिनिटे गप्पा मारणे (घरगुती समस्यांवर चर्चा वगळून).
-घरातल्या प्रत्येकाने स्वयंपाकघरात रोज किमान दहा मिनिटे काही तरी सहभाग घेणे.
-संगणकाविषयी माहीत करून घेण्याजोगे अफाट आहे, दर आठवड्यात ते थोडेथोडे मिळवण्याचा प्रयत्न करणे.
-संगणकावर गेम्स खेळायला, गाणी ऐकायला, वेगवेगळी वृत्तपत्रे/मासिके वाचायला शिकणे.
-देवनागरी व रोमन (मराठी व इंग्रजी) टंकलेखन शिकणे. ते अतिशय सोपे व उपयुक्त आहे.
-विजेचे प्रत्येक युनिट आणि पाण्याचा/इंधनाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा प्रयत्न करणे.
-दिवसभरात केव्हाही जमेल तेवढा व्यायाम करणे.
-रविवारी आपली नेहमीची कामे वगळून घरातल्या इतर व्यक्तींच्या कामात सहभागी होणे.
-दिवसभरात एक तरी जेवण घरातल्या सर्वांनी एकत्र घेणे.
-सहकुटुंब महिन्यातून एकदा एक चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन किंवा घरी सीडी आणून, पाहणे.
-वर्षातून एकदा महारातल्या एखाद्या नवीन ठिकाणी व एकदा देशातल्या ठिकाणी सहकुटुंब फिरायला जाणे.
-शहरातील एखाद्या समविचारी गट/संस्था/संघटनेत सहभागी होणे. समाजासाठी काही तरी देण्यासोबतच यातून स्वत:साठीही खूप काही करता/मिळवता येते.
-वर्षातून एकदा घरातल्या सर्वांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेणे.
-महिन्यातून एका ठरावीक दिवशी घरातल्या सर्वांचे वजन करून घेणे.
-मधुमेहासारखा आजार अचानक कमी झालेल्या वजनामुळे लक्षात येतो. वजन वाढले असले तर काय करायचे हे आपल्याला ठाऊक आहेच.
-निरोगी व्यक्तींनी वर्षातून किमान दोनदा स्वेच्छेने रक्तदान करणे.
-प्रत्येकाच्याच अनेक करायच्या राहून गेलेल्या गोष्टी असतात. त्या कागदावर उतरवून काढणे व त्यातल्या जितक्या जमतील तितक्या करणे.
-छोट्याछोट्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची सवय कमी करणे.
-एकटीने (विशेषत: महिलांनी) बाहेर पडण्याची सवय करून घेणे जेणेकरून आत्मविश्वास वाढेल.
-घरी दुचाकी/चारचाकी जे वाहन असेल ते चालवायला शिकणे.
-मॉलमध्ये खरेदी करताना अनावश्यक वस्तू विकत घेण्याचे प्रमाण कमी करणे.
-मुलांशी बोलताना आपण लेक्चर देत नाही ना, तेचतेच पुन्हापुन्हा बोलत नाही ना, याचा आवर्जून विचार करणे. तसे लक्षात आल्यास जाणीवपूर्वक मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करणे.
-मुलांची इतर कुणाशीही तुलना न करणे. म्हणजे मुलंही त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या पालकांशी आपली तुलना करत नाहीत.
-रोज एकदा मुलांना जवळ घेणे व त्यांच्याशी प्रेमाने पाच मिनिटे तरी बोलणे.
-आईवडील वा सासूसासरे आपल्याजवळ राहत नसतील तर त्यांच्याशी रोज फोनवरून किमान पाच मिनिटे बोलणे.
-घरातल्या किमान एक वर्ष हातही न लागलेल्या वस्तू, उदा. कपडे, चपला, स्वयंपाकघरातली भांडी गरजू व्यक्ती शोधून देऊन टाकणे.
-घरातील कमावत्या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार नीट ठेवणे, वेळेवर कर परतावा भरणे, गुंतवणूक, बचत आदि प्रक्रियांचे वेळापत्रक पाळणे. याचे तपशील नवरा किंवा बायको वा आईवडलांना माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
-वयाची साठी ओलांडलेल्या, थोडेसेही सोने/रोख/घर असलेल्या सर्व व्यक्तींनी मृत्युपत्र करून ठेवणे.
-दररोज वृत्तपत्रांतून येणारे किमान एक तरी शब्दकोडे/सुडोकू सोडवण्यासारखे बुद्धीला चालना देणारे काही करणे.
-चांगलं काही वाचलं तर लेखकाला पत्र/ईमेल/दूरध्वनीद्वारे दाद देणे.
-कल करे सो आज कर, आज करे सो अब, हे कधीकधीच ठीक आहे. जे काम उद्या करणे शक्य आहे ते आजच उरकण्याची घाई न करणे. घाईमुळे ताण येतो आणि त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. (कधीकधी दुस- दिवशी ते काम करण्याचीच आवश्यकता उरत नाही!)
-नाही म्हणायला शिकणे. घरात, कार्यालयात, समाजात वावरताना आपल्याला अनेक सूचना/विनंत्या केल्या जातात. त्या सगळ्या पाळणे अशक्य असते आणि त्रासदायकही. कोणीही व्यक्ती, कधीही, एकाच वेळी सर्वांना खूष ठेवू शकत नाही. आणि अशा   सर्व व्यक्ती खूष असतील तर तुम्ही स्वत: खूष असण्याची शक्यता कमी आहे.
-आपल्याकडे असलेलं कौशल्य कसं अधिकाधिक वापरता येईल, त्याचा विचार करणे. जे काम इतर व्यक्ती करू शकतात, ते त्यांच्यावर सोपवणे.
-कोणत्याही दोन व्यक्तींच्या काम करण्याच्या पद्धतीत, त्यासाठी लागणा- वेळात, फरक असतो. दुस-कडून परफेक्शनची अपेक्षा न ठेवणे. यासाठी थोडी सहनशक्ती जोपासण्याची आवश्यकता आहे. पण मनाच्या शांतीसाठी ती फार उपयोगी पडते.
-घरात थोडी धूळ असेल, कपडे धुवायचे बाकी असतील तरी आकाश कोसळत नाही. आठवड्यातून एखादा दिवस कामाला जुंपून घेऊन डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा थोडा वेळ स्वत:ला हवा तसा घालवणे घरातल्या सर्वांच्याच मानसिक व भावनिक आरोग्यासाठी चांगले असते.
-स्वत:साठी आवर्जून रोज ठरावीक वेळ ठेवणे. त्या वेळात मनाला येईल ते करण्याची किंवा अगदी काहीही न करण्याची मुभा स्वत:कडे ठेवणे.
या यादीत तुम्ही तुमची भर घाला आणि आम्हाला नक्की कळवा.

Comments