पाऊस पडून गेल्यावर...

पाऊस पडून गेल्यावर
मन पागोळ्यागत झाले
क्षितिजाच्या वाटेवरती
पाण्यावर रांगत गेले...

सौमित्रची ही कविता म्हणायची अजून पावसाने संधीच दिली नाहीये. राज्यात बहुतांश ठिकाणी जूनमध्ये सुरू झालेला पाऊस अजून पडतोच आहे. धरणं वेळेआधी भरतायत. एकंदरीत आनंदीआनंद आहे. अर्थात काही भाग आहेत अजून जिथे पाऊस नाही झालाय पुरेसा, पण तो होईल अशी चिन्हं आहेत. आजचा हा पाऊस विशेष मधुरिमा या आनंदात भर घालेल, याची आम्हाला खात्री आहे. या अंकासाठी साहित्य पाठवण्याच्या आवाहनाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातील बहुतांश साहित्य या अंकात प्रसिद्ध केले आहे. पावसासारखाच, गरम आल्याच्या चहाचे घोट घेत, या अंकाचा आनंद घ्याल अशी आशा आहे.

आज आठ वर्षांपूर्वी मुंबई पाण्यात गेली होती. राज्यात इतरत्रही त्या दिवशी खूप पाऊस झाला होता. मुंबईतल्या पावसात अडकलेली व्यक्ती माहीत नाही, असे महाराष्ट्रात तरी कोणी नसावे. घरात/ऑफिसात पाणी शिरलंय, गाडी/बस/ट्रेनमध्ये अडकून बसावं लागलंय, पाण्यात तासन्तास चालत घर गाठलंय, अशी वेळ आलेली एक तरी व्यक्ती सर्वांच्याच परिचयातली असते. ज्यांनी 26 जुलैचा पाऊस अनुभवलाय, ते तो विसरणं कधी शक्य नाही. आणि तरीही त्या अनुभवातून आपण नागरिक आणि राज्यकर्ते काहीही शिकलोय, याचा पुरावा इतक्या वर्षांत आजूबाजूला दिसलेला नाही. अजूनही थोड्याशा पावसानेही पाणी तुंबतं आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढण्याची वेळ येते. ही कथा मुंबईची नाही, सगळीकडची आहे. मुंबईत रेल्वे रुळांवर रंगीबेरंगी प्लास्टिकची ओंगळवाणी नक्षी दिसते तर गावोगावी रस्त्याच्या बाजूला, घाटात, नाल्यांमध्ये, गटारांमध्ये. यंदा समाधानकारक पाऊस होईल अशी चिन्हं आहेत आणि तरीही पुढच्या मार्चमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागणार नाहीच, याची शाश्वती नाही.
दरवर्षी पाऊस कमीअधिक प्रमाणात पडतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा आपण कांदाभजी, वडापाव खाऊन त्याचं स्वागत करतो. मग थोड्या दिवसांनी त्याला कंटाळतो. शहरात राहणारे लोक मनात म्हणत असतात, ‘कुठे पडायचा तो तलावात/धरणात पडू दे, इकडे आम्हाला त्रास कशाला?’ गावाकडचा शेतकरी म्हणतो, ‘माझ्या पेरणी/लावणी/कापणीची वेळ बघून पडू दे, चुकीच्या वेळी नको तो.’ पाऊस अर्थातच ‘खुद की मर्जी का मालिक’, पडायचा तितका आणि तिथे पडतो. देवाची कृपा म्हणून आपणही हातावर हात ठेवून पाऊस सहन करत राहतो. ना कचरा योग्य ठिकाणी टाकतो, ना रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपाय करतो. निसर्गाचा अनादर करत जगत राहतो.
या पार्श्वभूमीवर आजच्या अंकातले लेख वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. त्यात नुसतंच लहानपणचा, मी पाहिलेला पाऊस, गेले ते दिवस असं स्मरणरंजन नाही. बहुतेक सर्व लेखकांनी मागच्या महिन्यात उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख केला आहे. पाऊस विविध लोकांना कसा विविध प्रकारे आनंद देऊन जातो आणि कशाकशाची आठवण करून देऊ शकतो, याची इंटरेस्टिंग चित्रं यात वाचायला मिळतील.
पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा...

Comments