क्षमा असावी


हा वीकएंड एकदम सर्वधर्मसमभाव की काय म्हणतात त्यातला आहे बघा. आज दसरा. उद्या ज्यूधर्मीयांचा महत्त्वाचा दिवस, योम किप्पूर. आणि रविवारी बकरी ईद. दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय. योम किप्पूर हा पापक्षालनाचा दिवस तर ईद त्यागाचा. गणेशोत्सवाच्या सुमारास जैन पर्युषण पर्व पाळतात, तेव्हा मिच्छामि दुक्कडम् म्हणून क्षमा मागतात. हिंदूही फाल्गुनात पापमोचनी एकादशीचं व्रत करून मागल्या वर्षातली पापं धुवायचा प्रयत्न करतात.
कदाचित तुम्हाला असं वाटेल, की त्यात काय विशेष, आपण सॉरी तर इतक्यांदा म्हणत असतो. परंतु आपण जितक्या वेळा साॅरी म्हणतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा ते म्हणायची आवश्यकता असते, हो की नाही? दिवसभरात आपला कुणाला तरी धक्का लागतो, पाय लागतो, आपण कुणाला काही टोचून बोलतो, एखादं सांगितलेलं काम विसरतो किंवा विसरल्यासारखं दाखवतो, एखादं काम पुढे ढकलतो, टाळतो, इत्यादी इत्यादी. कुणाचे छोट्याशा गोष्टीसाठीही आभार मानत नाही, थँक यू म्हणायला जीभ उचलत नाही, ही गोष्ट वेगळीच. म्हणूनच कदाचित योम किप्पूर किंवा पर्युषणातील क्षमा किंवा ख्रिस्ती लोकांच्या थँक्सगिव्हिंग डेसारखे निमित्त योजले गेले असेल.
एका कार्यक्रमाला गेले होते मध्यंतरी, तिथे एका सहासात वर्षांच्या मुलाने पाठांतर केलेलं काही म्हणून दाखवलं. त्यातलं एक वाक्य चांगलं लक्षात आहे. रोज रात्री झोपताना दिवसभरात काही चुकलं असल्यास मला माफ कर आणि पुन्हा तशी चूक माझ्या हातून न व्हावी, अशी प्रार्थना केली की दुसरा दिवस चांगला जातो. आपल्याकडून जाणूनबुजून नाही, पण अजाणता काही ना काही चूक होतच असते. किंवा आपण आपल्या परीने, तत्त्वाला धरूनच, योग्य वागत असतो. पण त्याने समोरची व्यक्ती दुखावली जाते हे आपल्या लक्षातही येतं, पण आपण आपला बाणा सोडत नाही. म्हणून निदान आपल्या मनाशी तरी कबूल करावं, की आपण चुकलो.
कोणाची माफी मागायची, देव मानता का, कोणती शक्ती आहे जी आपल्याला माफ करते, मनातल्या मनात करून काय फायदा वगैरे प्रश्न योग्यच आहेत. परंतु एकदा अशी क्षमा मागितल्यानंतर पुन्हा आपण तीच चूक करताना किंवा तसेच वाग्बाण सोडताना एकवार विचार नक्की करू, हेही नसे थोडके. होय ना?

Comments