पुणे वृत्तांत

 परवाच्या शनिवारी पुण्याला गेलो होतो, गाडी केली होती भाड्याची, कारण हल्ली शिवनेरीचं एक तिकीट ५०० रुपये आहे. आईबाबा होते सोबत, मग विचार केला पैसे जास्त गेले तरी चालेल, सोय महत्त्वाची. संध्याकाळी आलेल्या पावसाने हा निर्णय योग्यच होता, यावर शिक्कामोर्तब केलंन जणू.
जाताना एक्प्रेस वे लागला तसा हिरवा रंग अधेमध्ये आणि आजूबाजूला उन्हाळ्याची चिन्हं दिसू लागली होती. गवत करपू लागलं होतं, पिवळसर तपकिरी रंग होता बराच. त्यामुळेच गुलाबी ते लाल यातल्या अनेक छटांनी रंगलेली पलाशाची झाडं लक्ष वेधून घेत होती. एक बहाव्याचं झाड फुलायला लागलं होतं. केशरी जाड रबरासारख्या पाकळ्या असलेल्या फुलांनीही झाडं भरून गेली होती. 

लोणावळ्याच्या आधी एका पडक्या रेस्तराँच्या बाहेर जर्द किरमिजी रंगाची बोगनवेल होती. पेल्टोफोरम कुठेकुठे बहरू लागला होता.
आणखी एक पिवळ्या फुलांचं झाड होतं, पण मला त्याचं नाव माहीत नाही. मुंबईत नाही पाहिलेलं मी फार ते. एक्स्प्रेसवेवर थांबायला मनाई असल्याने थांबून फोटो नाही काढता आले, याची फार रुखरुख लागून राहिली आहे.
घरी पोचलो, जावेच्या एकसष्ठीचा कार्यक्रम होता. गच्चीत करायचं ठरलंवतं, पण अचानक दाटून आलेल्या ढगांनी ते नियोजन बदलायला भाग पाडलं. मग घरातल्याच बैठकीच्या खोलीत चाळीसेक जण काही खेळ खेळलो. खेळांनंतर जेवण. मोडक नावाच्या केटररकडून आणलेल्या जेवणातला एक एक पदार्थ काबिल ए तारीफ होता. अजिबात तेलाचा तवंग नसलेला पनीर बटर मसाला व टोमॅटो सूप, बारीक चिरलेल्या भाज्यांचं लोणचं, वाटली डाळ, खड्या मसाल्याचा मस्त स्वाद असलेला पुलाव आणि घरच्या स्वयंपाकाच्या मावशींनी केलेल्या गरमागरम पुऱ्या असा फक्कड बेत होता. पातळ पारी, योग्य गोड असलेलं सारण आणि एका आकाराचे उकडीचे मोदक होते, पण ते मोडकांकडले नव्हते. पुणेकरांना या दोन शिफारशी मी नक्की करेन. मुंबईकरांना एकच सांगते, एक मोदक १५ रुपये होता फक्त, आपल्याकडे २० रुपये आहे!
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही गप्पाष्टक रंगलं. थोडी थंडी वाजत होती, शाली लपेटून गप्पा मारायला मजा आली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहापासून गप्पा पुन्हा सुरू झाल्या. पाऊस होताच साथीला.
दुपारी जेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, तीनच्या सुमारास. एक्स्प्रेसवे लागल्यानंतर मला वाटायला लागलं की ड्रायव्हर डुलक्या खातोय मधेच. मी त्याच्या मागे बसले होते, बाबा शेजारी आणि आई त्यांच्या मागे. त्यांनाही ते लक्षात आलंच. मग ड्रायव्हरशी बोलत राहिलो लोणावळ्याचा फूडमाॅल येईस्तो. चहा पिऊन गाडीपाशी आलो, तर हा पठ्ठ्या चाकावर डोकं ठेवून झोपलेला. मग पंधरावीस मिनिटं आम्ही ऊन खात बसलो, दत्तच्या कट्ट्यावर. त्याला उठवलं, निघालो. म्हटलं, झोप येतेय तर सांगायचं, आम्हाला काही घाई नाहीये घरी जायची. तर म्हणतो कसा, आंघोळ नाही, काही नाही, येणारच ना झोप.
घ्या. मला काही सकाळी लक्षात आलं नाही त्याला आंघोळीचं विचारायचं. दुपार, रात्र नि दुपार अशा तिन्ही वेळा मी त्याला जेवायला घरीच बोलवलं होतं. माझ्या लक्षात नाही आलं, तर त्याने का नाही विचारलंन, की माझी आंघोळीची सोय होऊ शकते का.
आमची गाडी नाही, भाड्याने गाडी करून कुठे जायची वेळ वर्षातून एकदा जेमतेम आली तर. त्यातून वस्तीला राहायची वेळ तर नाहीच. त्यामुळे माझ्या ते ध्यानात नाही आलं. या ड्रायव्हरला मी मागच्या वर्षी आॅफिसच्या कामासाठी नाशिकला घेऊन गेले होते, तेव्हा हाॅटेलवर उतरले होते. तिकडे त्याची सोय झाली होती.
पण त्याने आमच्याशी ही गोष्ट न बोलता, आमच्या व स्वत:च्या जिवाची बाजी का लावलीन, या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही.
मी हे लिहितेय एवढ्याचसाठी, की तुम्ही कधी अशी गाडी बाहेर नेलीत, तर ड्रायव्हरला आंघोळीचं नक्की विचारा. शेवटी प्रश्न आपल्या जिवाचा आहे, सुरक्षिततेचा आहे.
असो.
निघालो तेव्हा पाऊस होताच. घाट ओलांडला तशी थांबला होता, लख्ख ऊन होतं. जाताना आजूबाजूला दिसलेला रखरखाट चित्रकाराने अचानक पुसून टाकावा तसा गायब होता.
पनवेल येतायेता पाऊस पुन्हा लागला, तो मुलुंड गाठेस्तो आणि आज सकाळपर्यंत सुरूच होता.
पुण्यात रविवारी सकाळी काही जणांना भेटायचं ठरवलं होतं, पण पावसामुळे कंटाळा केला. आता पाहू कधी जमतंय ते.


Comments