व्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ काय?

आठ-दहा दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळी वर्तमानपत्र हातात आल्याआल्या पहिली बातमी दिसली तरी मद्यधुंद वकील महिला चालकाच्या बेदरकार गाडी चालवण्यामुळे अपघात होऊन दोघांचा मृत्यू. यातल्या प्रत्येक शब्दाला आपला प्रतिसाद कसा असतो?

मद्यधुंद - दारू पिऊन कशाला रे गाड्या उडवता?
महिला - अच्छा, गाडी बाई चालवत होती तर.
वकील - इतकी शिकलीय, कायदा कोळून प्याली असेल ना.
दोन मृत्यू - बापरे, दोन जण गेले बिचारे.
कोणती गाडी होती तिची? आॅडी. व्वा, पैसा खोऱ्याने ओढत असेल म्हणजे.
दारूच्या नशेत गाडी चालवताना झालेले अपघात जगभरासारखेच भारतातही हजारो होत असतात. कधी त्यात चालकही जीव गमावतो, तर अनेकदा कोणतीही चूक नसलेल्या तिसऱ्याच माणसाचा जीव जातो. मुंबईतल्या या अपघातात चालक जान्हवी गडकर हिला थोडंफार खरचटलं, कारण तिच्या आॅडी या परदेशी बनावटीच्या अत्यंत महागड्या गाडीत असलेल्या एअर बॅगने गाडीला लागलेला जोरदार धक्का पचवला होता. दुसऱ्या दिवशी बातमी आली की, दोनतीन दिवसांपूर्वी जाह्नवीच्या गाडीने कोणाला तरी ठोकलं होतं, परंतु त्याची तक्रार दाखल झालेली नव्हती.
नवीन गाडी शिकणाऱ्या किंवा अठरा वर्षांखालच्या, परवानाही नसलेल्या मुलामुलींच्या हातून अपघात होत असतात, त्यासाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरता येतं, धरलं जातंही. परंतु, एक यशस्वी वकील असणाऱ्या जान्हवीच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. जे काही झालं, त्याला तीच पूर्णपणे जबाबदार होती. जान्हवी एका मोठ्या उद्योगसमूहात अतिशय वरच्या पदावर होती. त्यासाठी ती जीव तोडून, घड्याळाच्या काट्याकडे न पाहता काम करत असेल. त्या संध्याकाळी एक मोठं काॅर्पोरेट डील झालं होतं, ते साजरं करण्यासाठी ती तिच्या सहकाऱ्यांसोबत पार्टी करत होती. हे सगळं एक पुरुष करताना आपण आजवर शेकडो वेळा पाहिलंय, आपल्या घराघरातले यशस्वी पुरुष ते करत आलेत. परंतु, इतक्या लहान वयात इतकी मोठी जबाबदारी सांभाळणारी जाह्नवी अजून घराघरात जन्माला आलेली नाही.
मद्यपान हा काॅर्पोरेट क्षेत्रातला आनंद साजरा करायचा एक सर्वमान्य प्रकार आहे. तो आता इतर क्षेत्रांतही पसरला आहे. जाह्नवीनेही तेच केलं होतं. केवळ ती स्त्री आहे, म्हणून तिने दारू पिणं, पार्टी करणं, अपरात्री बाहेर राहणं, चुकीचं आहे असं आपल्याला का वाटतं? जान्हवीच्या जागी पुरुष असता तर आपली प्रतिक्रिया अशीच झाली असती का? नैतिक टीकािटप्पणी करताना स्त्री वा पुरुष हा भेद अस्थानी असतो. चुकीची तीव्रता बाई असल्याने वाढत नाही, तशीच कमीही होत नाही. अपघात झाला, दारूच्या नशेत गाडी चालवण्याची चूक झाली, त्या चुकीवर खोटेपणाचं, पैशाच्या मुजोरीचं आणि बेफिकिरीचं पांघरूण घालणं हे माणूसपणा हरवत चालल्याचं लक्षण आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर ती स्वीकारण्याऐवजी खोटं बोलून, सारवासारव करून, आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना तिचं वकिलीचं ज्ञान उपयोगी पडलंही असेल कदाचित.

नशा उतरल्यानंतरही तिने संवेदना जिवंत असल्याचं दर्शवणारं काहीच वर्तन केल्याचं वाचनात तरी आलेलं नाही.
वयाच्या पस्तिशीतच मिळालेलं झळझळीत यश, अमाप पैसा, या पैशामुळे विकत घेण्याजाेगी भौतिक सुखं यातून आलेली बेदरकारी स्त्रियांमध्येही आता दिसून येऊ लागली आहे, हे या अपघातामुळे अधोरेखित झालं आहे. पैसा, पद आणि सत्ता यांचा परिणाम पुरुषांसारखाच स्त्रियांवरही होऊ लागलाय. स्त्रियांच्या अंगभूत संवेदनशीलता, कोमलता, हळुवारपणा, वात्सल्य, समतोल आदी गुणांना ही त्रिगुणी मात्रा मारक ठरू लागली आहे, असं वाटायला लागलंय. पुरुषांची बरोबरी साधण्यासाठी त्यांच्यासारखे कपडे आपण स्वीकारले, कारण नाही म्हटलं तरी ते वागवायला व वावरायला अधिक सोपे आहेत. त्यांच्यासारखी शिवराळ भाषा, धूम्रपान, मद्यपान, इतर नशा, बेफाम गाडी हाकणं या सगळ्यामुळे त्यांची बरोबरी करतोय, त्यांच्या पातळीला पोहोचलोय असं मुलींना वाटू लागलं आहे. कदाचित असं वागल्याने पुरुष सहकारी आपल्याला स्वीकारतील, त्यांच्या आतल्या वर्तुळात आपलाही समावेश होईल, अशी आशाही त्यामागे असेल.
मद्यधुंंद अवस्थेत चुकीच्या मार्गावरून गाडी चालवत दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या जान्हवी गडकर प्रवृत्तीला व्यक्तिस्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला आहे का? की पद, पैसा आणि प्रतिष्ठा कॉर्पोरेट जगतात वावरणाऱ्या महिलांपुढे नवनवी प्रलोभने आणि आव्हाने निर्माण करत आहेत? शिक्षणाने आलेली आत्मनिर्भरता व नोकरीमुळे मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य याचा अर्थ, याचं मोल जान्हवी आणि तिच्यासारख्या मार्गावर जात असलेल्या मुलींना कधी कळणार? स्त्रीमुक्तीचा, स्त्रीवादाचा, आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा हा चुकीचा अर्थ आहे, हे त्यांना कसं समजावून सांगणार आहोत आपण?

Comments