आयसीयू : तुरुंग की संधी?

मोठ्या हाॅस्पिटलमधल्या आयसीयूत कोणी असेल, तर सोबत करणाऱ्याची अवस्था फार बिकट असते. ती व्यक्ती शुद्धीत असली तरीही दिवसातला तासभर सोडून आपण तिच्यासोबत राहू शकत नाही, एवढंच काय दुरून पाहूही शकत नाही, अर्थात आपण त्या व्यक्तीलाही दिसू शकत नाही. तिच्या समोर असतात इतर अत्यंत गंभीर रुग्ण, नर्स व डाॅक्टर. आणि प्रचंड व चित्रविचत्र नळ्या लटकणारी उपकरणं. त्यामुळे त्या रुग्णाला तुरुंगात टाकल्यासारखं वाटत नसेल का?

त्या व्यक्तीच्या जवळ बसण्याची, काही बोलण्याची, हातात हात धरण्याची परवानगी दिवसातून दोनतीन वेळा मिळाली तर तिला लवकर बरं नाही का वाटणार? आपण एकटे नाहीत, आपली मुलं, कुटुंब, नातलग, शेजारी, मित्रमैत्रिणी - ज्यांच्या सोबतीने आपण एरवी जगत असतो - ते आहेत आजूबाजूला, त्यांना आपली काळजी वाटते, ते आपल्यावर प्रेम करतात, असं सांगण्याची, कळण्याची हीच वेळ नाही का?

त्या व्यक्तीला आवडेलसं, सुखावणारं, दिलासा देणारं संगीत तिला ऐकवू शकलो, तर तिला लवकर बरं नाही का वाटणार? किमान तिचे शेवटचे दिवस अल्प आनंदात जाऊ शकतात.

हातात हात धरला तर एरवीही किती बरं वाटतं आपल्याला?

मग वेदना होत असताना, औषधांच्या गुंगीत असताना, तोंडाला चव नसताना, आपण जगतोय की चाललोय याविषयी अनिश्चितता असताना, आपली माणसं जवळ असायला काय हरकत आहे?

मान्य आहे की, आयसीयूत रुग्णाला ठेवण्याचं मुख्य कारण जंतुसंसर्ग टाळणं हा आहे. पण आयसीयूत काही दिवस काढलेल्या रुग्णाचं मानसिक आरोग्य कितपत ठीकठाक असेल? ती व्यक्ती पूर्वीसारखीच राहात असेल का? सोबतीला जाणाऱ्या व्यक्तीला पुरेशी काळजी घेऊन तिथे काही काळ घालवू देणं खरोखरच अशक्य आहे का? आयसीयूत असणाऱ्या नर्स प्रेमाने त्यांची काळजी घेत असतीलच, त्यांच्याबद्दल काहीच शंका नाही. परंतु, आपल्या ओळखीचे चेहरे समोर असले तर अधिक बरं नाही का?

काही दिवसांपूर्वी एका अत्यंत जवळच्या व्यक्तीला आयसीयूत ठेवल्यानंतर डोक्यात आलेले हे विचार. जवळजवळ पंधरा दिवस ती व्यक्ती आयसीयूत होती, कोमात नव्हती पण औषधांना व संभाषणाला प्रतिसाद कमी होता. दिवसभर दोन व्यक्ती हाॅस्पिटलच्या वेटिंग लाउंजमध्ये बसून असायच्या. रात्री कोणीतरी झोपायला जायचं, तेही आयसीयूपेक्षा वेगळ्या मजल्यावर. संध्याकाळी चार ते पाच भेटायची वेळ होती, तेव्हा अनेक जण जाऊन येत, परंतु तेव्हाही फार वेळ बसू दिले जात नसे. आयसीयूतून बाहेर आणल्याच्या दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती गेलीच. पण डोक्यातलं वादळ सुरूच राह्यलं. आपण तिच्या शेवटच्या दिवसांत तिच्यासाठी काही करू शकलो का? तिने आयुष्यभर इतकं प्रेम दिलं, काळजी घेतली अापली आणि तिच्यासाठी काही करण्याची संधी आपल्याला मिळालीच नाही, असंच आम्हा सर्वांना वाटत राह्यलं.

हा विषय काही जणांकडे काढल्यावर माझ्या एका डाॅक्टर वहिनीने वेगळाच मुद्दा मांडला. ती म्हणाली, ''थोडासा वेगळा angle. हा शेवटचा प्रवास एकट्याचाच आहे. ( खरंतर जगणंही एकट्याचंच असतं) इथले पाश तोडायलाच लागणार. infection वगैरे मुद्दे आहेतच. पण त्याव्यतिरिक्त जर त्या शेवटच्या काळात जीवनाचे सिंहावलोकन करायचा व पुढील प्रवासाची एकट्यानेच तयारी करायचा अवधी असेही बघता येईल. ( हा विचार झेपला तरच ) नाहीतर इथेच गुंतून राहणे. पुन्हा तोच खेळ खेळणे.''

यामुळे या विचाराला वेगळंच वळण मिळालं. आयसीयूमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्णच मरणाच्या दारात असतो असं नव्हे, किंवा त्याचं सर्वसामान्य सरासरी आयुष्य उपभोगून झालेलं असतं, असंही नव्हे. अनेक तरुण किंवा अगदी लहान मुलंही आयसीयूत असतात, आणि त्यातले अनेक खडखडीत बरी होऊन अनेक वर्षं जगतात. परंतु, साधारण वयाची सत्तरी ओलांडलेल्या रुग्णांना हा विचार लागू होऊ शकतो. त्या वयात आपण आपल्या आयुष्याकडे एका तटस्थ नजरेतनं पाहण्याची आवश्यकता नक्कीच आहे, तेवढा अनुभव आपल्या गाठीशी असतोच जमा झालेला. मग, आतापर्यंत काय केलं, आणि जगलोवाचलो तर पुढचं आयुष्य कसं काढायचं, याचा सकारात्मक विचार करायची ही चांगली संधी असू शकते.

हा म्हटलं तर आध्यात्मिक वगैरे विचार आहे, म्हटलं तर अगदी प्रॅक्टिकल. एकटेच आलो नि एकटेच जाणार, हे आपल्याला थिओरेटिकली माहीत असतं, अंगवळणी नसतं पडलेलं. ''खाली हाथ आया है तू, खाली हाथ जायेगा,'' हे माहीत असतं, पण हात ''खाली'' ठेवणं काही केल्या जमत नसतं. गोतावळ्यात असताना, आयुष्यातल्या रोजच्या लढाया लढत असताना हा विचार करणं सर्वांनाच जमेलसं नाही. परंतु, अशा लादल्या गेलेल्या एकांतात हा विचार करणं अशक्य नसावं. 

तसंच, आजूबाजूला असलेल्या इतर अतिशय आजारी असलेल्या रुग्णांकडे पाहून, आपण यापेक्षा बरे, असंही वाटू शकतं एखाद्या व्यक्तीला. आयसीयू Count your blessings हा मोठा धडा रुग्ण व त्याच्या आप्तांना शिकवू शकतो. मी जेव्हा रात्रीची झोपायला गेले होते त्या हाॅस्पिटलात, तेव्हा माझ्यासोबत एक साधारण ५५ वर्षांची बाई होती, शेजारच्या बेडवर. साहजिकच आम्ही आपापल्या "पेशंट"बद्दल बोललो. 

तिने मला विचारलं, तुम्ही कोणाची सोबत करताय?

मावशी.

त्यांच्या घरचं कोणी नाहीये का?

आहेत ना, दिवसभर असतात, आम्ही बाकीच्या भावंडांनी नंबर लावलेत रात्री झोपायला. घरच्यांना बाकीचीही कामं असतात ना?

अरे वा, नाहीतर आमच्याकडे पाहा. 

का बरं?

मी आलेय माझ्या आत्तेसासूची सोबत करायला. डायबेटिसकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी आणि मुलांनी. अखेर आज पाय गुडघ्याच्या खालनं कापावा लागला. त्याही ८० वर्षांच्या आहेत. करोडपती आहेत मुलं. सकाळी आॅपरेशनच्या वेळी आली होती, संध्याकाळी सहा वाजता घरी निघून गेली. मी झोपायला येईस्तोही थांबली नाहीत. की मी आल्यावर फोन नाही, आलीस का, आई कशी आहे वगैरे. त्या म्हातारीला पाय कापल्याचा इतका शाॅक बसलाय, कसं आणि कोण समजावणार?

त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार होता - Count your blessings.

Comments