गुणीदास संगीत संमेलन

३९व्या गुणीदास संगीत संमेलनाचा पहिला दिवस, ३ डिसेंबर २०१५. उस्ताद रशीद खान यांना ऐकण्याची संधी मिळणार असल्याने मी खुष होते. या वर्षाच्या सुरुवातीला जॅनफेस्टमध्ये त्यांना ऐकलं होतं. आणि वर्षाचा शेवटही त्यांच्या सुरांनी होणार होता. वा!

तर सुरुवात केली सावनी शेंडे यांनी. पूरिया धनाश्री फार बहारदार गायल्या. अनेक दिवसांनी असा तब्येतीत गायलेला बडा ख्याल ऐकला. नाहीतर अनेक कार्यक्रमांमधून हल्ली जास्तीत जास्त अर्धा तास एक चीज, नंतर पाच पाच मिनिटांची ठुमरी/कजरी/भजन वगैरे. सावनी जवळपास तासभर गात होत्या. केसर रंग शाम छाई, लागे सांज आज नवेली ही मूळ बंदिश. मध्य लयीत त्यांनी कुमारजींची दिन डूबा, आ जरा गायली आणि द्रुतमध्ये आडा चौतालातला तराणा. मुकुंदराज देव यांची तबल्यावरची साथ उत्तम, पण श्रीनिवास आचार्य यांच्या हार्मोनियमची जादू वेगळीच होती.
सावनी यांनी शेवटी त्यांचे वडील व गुरु डाॅ. संजय शेंडे यांची मिश्र मारुबिहागमधली रचना गायली.
मतवाले बलमा, नैना मिला के मत जाना. फार रंगवून गायल्या त्या.
 

नंतर प्रवीण गोडखिंडी यांची बासरीवादन होतं. बासरी ऐकायला मी फार उत्सुक नसते, पण कानावर पडली की आवडतेच. त्यांनी मिश्र पहाडी धून वाजवताना circulation breathing तंत्र वापरून काही वाजवलं. त्याची तांत्रिक बाजू मला कळणारी नव्हती, त्यांनी यासाठी साडेतीन वर्षं रियाझ केला, असं सांगितलं. परंतु ते ऐकायला भारी होतं.
 

आता वाट पाहात हाेतो उस्ताद रशीद खान यांची.
alas!
ते आजारी असल्याने येणार नाहीत, असं जाहीर केल्यावर आता निघावं की काय असा विचार मनात येतो तोच, जयतीर्थ मेवुंडी गातील असं जाहीर झाल्यावर पाय उचलायचा प्रश्नच नव्हता.
 

जयतीर्थ यांनी इतक्या ताकदीने दरबारी गायला, बापरे. He had absolute raw command over the sur. i can't think of any other word for that.
 

आणखीन आनंदाची बाब म्हणजे तिथे मध्यंतरात झालेली अाशय गुणेची भेट. मी जे काही लिहिलंय ते एक सामान्य श्रोता या नात्याने. त्यातले बारकावे आशय अधिक चांगले मांडू शकेल.
 

जाता जाता.
आमच्याकडे दोन तिकिटं जास्तीची होती.
सुरुवातीलाच मैत्रिणीची वाट पाहताना एका ५५-५७ वर्षांच्या गुजराथी माणसाने विचारलं, एक तिकिट है क्या आप के पास. तिकिटं होतीच, आणि ती वाया घालवायची नाहीत हे सकाळीच ठरवलं होतं. त्याला एक तिकीट दिलं.


दोन मिनिटांनी एका मराठी माणसाने तिकीट आहे का विचारलं. अर्थातच त्याला देऊन टाकलं. तो नंतर म्हणाला, त्याचं तिकीट काढलेलं होतं, पण मुलगा वेळेवर पोचू नव्हता शकला त्यामुळे त्यांना कार्यक्रम हुकतो की काय वाटत होतं. आमच्यामुळे त्यांना आनंद घेता आला.


दुसऱ्या दिवसाची सुरुवात शौनक अभिषेकी यांनी केली. मारवा गायला त्यांनी. मला काहीसा कंटाळवाणा वाटला. हा माणूस चांगला गायक आहे, याचा पुरावा देणाऱ्या काही जागा होत्या, परंतु एकूण तासभर कंटाळा आला. त्या मानाने त्यांनी नंतर गायलेल्या हमीरमधल्या दोन बंदिशी - अचल राजधानी आणि चंचल चपल मदमाती - जरा रंगल्या.
 

यानंतर उत्सुकता होती कला रामनाथ यांच्या व्हायोलीनची. सोबत तबल्यावर योगेेश सम्सी होते. त्यांनी बिहाग वाजवला, असं म्हणणं त्यांनी निर्मिलेल्या माहोलवर अन्याय करण्यासारखं होईल. जगविख्यात वादक एन. राजम यांच्या भावाची कला ही मुलगी. कलाचे आजोबाही व्हायोलीन वादक होते. पं. जसराज यांच्या त्या शिष्या. गडद निळ्याजांभळ्या, बारीक लाल काठाची साडी नेसलेल्या कला लाजऱ्या, हसऱ्या. परंतु त्यांनी व्हायोलीनने जणू रसिक श्रोत्यांच्या हृदयाचीच तार छेडली. काळजाला घरं पाडणारा बिहाग विलंबितमध्ये त्यांनी सादर केला. त्या एक विरहाची गोष्ट सांगत होत्या असं वाटत होतं. आणि त्या हळुवार गोष्टीचा मूड द्रुतमध्ये एकदम बदलून गेला. पं. सम्सी यांच्याशी त्यांची जुगलबंदीही काही मिनिटं अतिशय रंगली. म्हणजे दोघांच्या चेहऱ्यांवर अतिशय सौम्य भाव आणि वाद्यं मात्र कडकडून वाद घालत होती एकमेकांशी.
पं. सम्सी हे स्थितप्रज्ञ म्हणावे इतके शांत असतात तबला वाजवताना. मानही हलत नाही त्यांची. चेहऱ्यावर हसूही दुर्मीळच. अर्थात हे माझं निरीक्षण, चुकतही असेल. काल मात्र त्यांनी कलाजींसोबत वादन खरोखर एंजाॅय केलं, असं वाटत होतं.


मध्यंतरानंतर किराणा घराण्याचे पं. वेंकटेश कुमार यांनी गायला सुरुवात केली. मी या विषयावर लिहायला खरंतर नको, कारण, या इतक्या गुणी ताकदीच्या कलाकाराला मी आजवर ऐकलंच नव्हतं. मला खरोखरच लाज वाटली काल.
तर, पंडितजी सुरांच्या विस्तीर्ण अंगणात मनसोक्त खेळत होते आणि आम्ही रसिक त्यांच्या मागेमागे ओढले जात होतो. त्यांनी पग लागन रे महाराजा ही मालकंसमधली बंदिश विलंबितमध्ये गायली. द्रुतमधली रंगरलिया करत सौतन के संग गाताना ते जणू स्वत:च ही तक्रार करणारी सखी बनून पियासोबत भांडत होते. तेही चेहऱ्यावर हसू विलसत ठेवून. पाऊणएक तास त्यांनी बहार उडवली.
यानंतर सीतापति रामचंद्र रघुपती रघुराई, भज ले अयोध्यानाथ दूसरा न कोई हे भजन त्यांनी गायलं. तुलसीदासांची ही रचना त्यांनी फारच प्रेमाने आळवली.

हे गाऊन ते उठले, परंतु श्रोत्यांनी भैरवीची मागणी केल्याने त्यांचा नाइलाज झाल. दहा वाजून दहा मिनिटंच झाली होती. मग त्यांनी श्यामसुंदर मदनमोहन ही अवीट गोड भैरवी गायली. अजूनही ती ऐकू येतेय.

या सगळ्या अनुभवाला दृष्ट लागू नये, याची काळजी आजूबाजूचे रसिक (?) श्रोते घेत असतात. पाच मिनिटं सलग जात नव्हती, जेव्हा कोणी जागचं उठत नव्हतं. माझ्या समोरचा एक माणूस पूर्ण तीनचार तास फोन पाहात होता, व्हाॅट्सअॅप नि फेसबुक.
 

अनेक लोक रेकाॅर्ड करत होते कार्यक्रम, तोही व्हिडिओ. एक मुलगी तर एक छाेट्या ट्रायपाॅडवर मोबाइल ठेवून तो स्टेजवरच थेट उभा करून रेकाॅर्ड करत होती. रेकाॅर्ड करण्यावर आक्षेप घेता येत नाही, कारण ध्वनिमुद्रण तर कोणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने करता येतं. ते बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचंही होतं. परंतु असा दुरून काढलेला व्हिडिओ कितपत बरा होत नसेल, ठाऊक नाही. आणि त्याच्या बॅकलाइटचा त्रासही होतो.
जो अधिकृत फोटोग्राफर होता, त्याच्याही फोटोच्या फ्लॅशमुळे व्यत्यय येत होता. फोनवर बोलणारी मंडळी होतीच, नि तो सायलेंट न केलेलीही.
 

पण, तक्रार कुठे करणार?

गुणीदास संगीत संमेलनाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात संतूरवादनाने झाली. परंतु मी आशयसोबत गप्पा मारत बसले होते, त्यामुळे ते ऐकले नाही.

त्यानंतर Kalapini Komkali गाऊ लागल्या. शिवकेदारमधील जोगी जागो रे ही बंदिश त्यांनी सुरू केली आणि त्यांनी श्रोत्यांचा ताबाच घेतला. she took the sammelan to the next level. त्यांचा आवाज एकीकडे मख्खन तर दुसरीकडे तेजतर्रार लागत होता. द्रुतमधली बंदिश जो दिया सो लै री, मान ले सीख मेरी हीदेखील अप्रतिम.
यानंतर त्यांनी सिंदुरा रागातील ना दैंया मैं अब ना जाऊँगी गायली. गाताना तबला, पेटी व तानपुऱ्यावरील साथीदारांना गाण्यात सहभागी करून घेतायत असं वाटतं. कलाकारांमधलं हे माणूसपण मला वैयक्तिक फार भावतं, म्हणून हा उल्लेख.

मिश्र काफीमध्ये तराणा आणि छाडो छाडो चला मोरी बैंया, दुखत मोरी नरम कलाई... ही बंदिशही सुखावून टाकणारी होती.
 

त्यांच्यानंतर अमजद अली खान यांचं सरोदवादन होतं. उस्तादजींचं वय झालंय, पण काही क्षणांत राग उभा करण्याचं कसब हातात कायम आहे. त्यांनी सुरुवातीला बागेश्रीतील रचना वाजवली, जी साडेबारा मात्रांमधली होती. समोर मुकुंदराज देव होते तबल्यावर, त्यांची परीक्षाच जणू. अर्थात ते उत्तम रीतीने उत्तीर्ण व्हावे, यात नवल नाही. या अनवट लयीमुळे प्रत्येक समेला टाळ्या मिळत होत्या.
उस्तादजींनी नंतर त्यांचा आवडता दुर्गा, वैष्णव जन तो, एकला चालो रे या धुन वाजवल्या. ज्या पूर्वी अनेकदा एेकल्यात. पुन्हा ऐकतानाही गोडच वाटतात अर्थात.


त्यांनी शेवटी एक मुद्दा मांडला, जो महत्त्वाचा होता.
ते म्हणाले,
The world is divided in two kinds. world of sound and world of words. thank god i belong to the world of sound, i can't manipulate with sound. 


तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात नऊ चांगले कलाकार एेकायला मिळाले. मात्र किमान शंभरेक, खरंतर जास्तच, खुर्च्या तरी रिकाम्या होत्या. बुक माय शोवर सगळी तिकिटं गेल्याचं दिसत होतं, अर्थात त्यांना काही टक्केच तिकिटं दिली असणार महाराष्ट्र ललित कला निधीने. आजकाल आॅनलाइन तिकिटं जास्त काढली जातात, नेहरू सेंटर तसं आडनिडं. तिकिटं काढायला मुद्दाम तिथे जाणं कठीण. त्यात अशा कार्यक्रमांना येणाऱ्यांमध्ये ६० टक्के ज्येष्ठ नागरिक, त्यांना अाॅनलाइनही तितकंच कठीण वाटतं. म्हणून तर रिकामं नव्हतं आॅडिटोरियम?
आता बऱ्याच नाटकांची तिकिटं फोनवरून बुक करता येतात, नाटकाच्या वेळी जाऊन ती घेता येतात. थोडे जास्त पैसे अशा वेळी द्यायला लोक तयार असतात. कारण मुंबईत वेळ ही दुर्मीळ गोष्ट.
यावरून आयोजकांना काही धडा घ्यावा लागेलसं वाटतं. त्यांना प्रायोजक तगडे असतात, तिकिटं विकून पैसे कमवायचे नसतात त्यांना. परंतु रिकाम्या आॅडिटोरियमसमोर गायला, वादन करायला कसं वाटत असेल कलाकारांना? 

Comments