हे क्रिकेटही पाहूया

क्रिकेटचं भूत अनेक वाचकांच्या मानगुटीवर बसलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून आणि पुढचे दोन महिने तरी ते उतरण्याची चिन्हं दिसत नाहीत. सध्या तर डबल धमाका सुरू आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघांची टी २० विश्वचषक स्पर्धा सुरू आहे, तीही भारतात. आनंदाची गोष्ट म्हणजे, महिलांच्या सामन्यांनाही स्टेिडयमवर बऱ्यापैकी गर्दी दिसतेय, तसंच टीव्हीवरही हे सामने पाहणाऱ्यांची संख्या वाढलीय. जितके अधिक प्रेक्षक, तितक्या अधिक जाहिराती, तितकी जास्त कमाई या क्रिकेटपटूंची असं हे गणित आहे. भारतात गेल्या पाच-सहा वर्षांत महिला क्रीडापटूंना चांगलंच ग्लॅमर प्राप्त झालंय. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा, राही सरनोबत, कविता राऊत, कोनेरू हम्पी या स्टार झाल्या आहेत, आणि त्यांच्या पाठोपाठ शेकडो मुली खेळ खेळू लागल्यात, खेळाकडे करिअर म्हणून पाहू लागल्यात. पालकांनाही आपली मुलगी खेळतेय, याचं कौतुक आहे, ते तिच्या यशासाठी जोरदार प्रयत्न करतायत.
या स्टार्सच्या यादीत मिताली राज, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत या आपल्या क्रिकेटपटूही आल्या. या दोघी गेल्या १६-१७ वर्षांपासून भारतीय संघात खेळतायत म्हणजे त्यांचा स्टॅमिना काय असेल, याचा विचार करा. या दोघींनी ज्या अंजुम चोप्राच्या नेतृत्वाखाली अनेक सामने खेळले ती अंजुम आपल्याला टीव्हीवर समालोचन करताना दिसते. या सगळ्यांची आदर्श होती डायना एदलजी, भारतीय संघाची कर्णधार.
गेल्या वर्षात भारतीय क्रिकेटविश्वात वर आलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे जेसिंथा कल्याण. बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानाची क्यूरेटर म्हणून ती काम करतेय, पुरुष वा महिला कोणाच्याही क्रिकेट सामन्यांसाठी मैदान आणि प्रत्यक्ष खेळपट्टी तयार करणारी भारतातली ती एकमेव महिला आहे.
पुरुषांच्या सामन्यांदरम्यान टीव्हीवर झळकणाऱ्या निवडक ललनांपेक्षा जेसिंथा, मिताली, झूलन, हरमनप्रीत या अधिक खऱ्या नायिका. त्यांना आपण चिअर करायला हवं ना? उद्या आणि परवा महिला विश्वचषकाचे उपांत्य फेरीचे सामने आहेत, आणि रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. भारताचा संघ यात कदाचित नसेलही, तरीही हे सामने टीव्हीवर तरी आपण पाहू या अाणि खेळाचा आनंद लुटू या. षटकार धोनीने मारलेला असो की मितालीने, आनंद तेवढाच असणारेय!

Comments