बनारसिया ३

 पायी बनारस
सकाळी दहाला बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) पाहायला जायचं होतं. थोडा वेळ आराम केला, नाश्ता करून निघालो. इथेही आम्हाला ईरिक्षा बरी वाटली. त्याला थांबवून घेतलं कारण विद्यापीठाचा परिसर प्रचंड मोठा आहे. प्रवेशद्वारही भलंमोठं. बीएचयूमधलं विश्वनाथ मंदिर पाहण्याजोगं आहे. मुख्य मंदिरापेक्षा तेच बरं, असं तिथली स्वच्छता, शांतता, मोकळा प्रशस्त परिसर पाहून वाटलं. इथे गर्दी फार नव्हती किंवा आवार मोठं असल्याने वाटत नव्हती. मंदिरात, आसपासच्या हिरवळीवर मुलं अभ्यास करत होती. मंदिराच्या बाहेर दुकानं आहेत, खाऊची आणि टिपिकल टूरिस्टी. मंदिरातून आम्ही बीएचयूमधल्या कला भवनमध्ये गेलो, इथे खूप मोठं संग्रहालय आहे. जुन्या मूर्ती, शस्त्रास्त्रं, चित्रं पाहण्यात तासनतास जातात. बनारस शहराबद्दल माहिती देणारं एक दालन आहे. बीएचयूच्या स्थापनेत ज्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता त्या पं. मदनमोहन मालवीयांविषयी माहिती देणारंही एक दालन आहे. इथे आत मोबाइल वा कॅमेरा नेता येत नाही, ते ठेवण्यासाठी लाॅकर्स आहेत. आम्ही बॅग्सही त्यात ठेवल्या व मोकळ्या हाताने फिरलो. नाहीतर बॅग सांभाळणं फार जिकिरीचं होतं अनेकदा. संग्रहालयाची उत्तम देखभाल ठेवलेली आहे, परंतु फार कमी लोक इथपर्यंत पोचतात. आम्ही गेलो तेव्हा दहा माणसंही असतील नसतील.
BHU विश्वनाथ मंदिरातली एक भिंत

विद्यापीठाच्या परिसरात जिकडेतिकडे विद्यार्थी होते. प्रत्येक विभागाची एक इमारत, दोन मजली असेल पण आडवी पसरलेली, भोवती हिरवळ आणि झाडं. असे अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभागाचं वसतिगृह वेगळं आहे. सर्व इमारती एकसारख्या. एखाद्या सुनियोजित शहरासारख्या. बीएचयूचं शैक्षणिक क्षेत्रातलं स्थानही फार वरचं आहे. इथे शिकायला यायला फार आवडलं असतं, असं सारखं वाटत राहिलं. हा सगळा परिसर आम्ही रिक्षातनं फिरलो, कारण ऊन खूप होतं आणि इतकं चालणं शक्य नव्हतं.

घरी आलो, जेवून आराम केला आणि पुन्हा एकदा साडी खरेदी मोहिमेवर. पण या खेपेला तासभरच तिथे घालवला. आणि भटकायला बाहेर पडलो. आम्हाला बनारसच्या सुप्रसिद्ध गल्ल्या पाहायच्या होत्या. मग आम्ही सुमीतच्या घरी जायचं ठरवलं. पत्ता ठाऊक असला तरी कोणाच्या मदतीशिवाय तिथे पोचणं केवळ अशक्य. मग छोटेलाल आमच्या सोबत आले. शुभांगी पंढरपूरची आहे, पण तीही या गल्ल्या पाहून हबकलीच. वर्षाताईला सुमीत बाइकवरून घेऊन गेला, चालायला त्रास होईल म्हणून. तर ती येताना म्हणाली, मी चालतच येते आपली, बाइकवर भीती वाटते खूप. गायीगुरांना हुकवत, वाटेतले शेणाचे पो चुकवत सुमीतच्या घरी पोचलो. ३०० वर्षं जुनं हे घर. इकडच्या घरांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळी घरं एकमेकाला लागून, काॅमन भिंती. दोन घरांच्या मध्ये जागा, अंगण वगैरे प्रकार नाही. उभी, चारमजली घरंं. हे शहर बडा पुराना है, शेकडो वर्षांपासून इथे लोक येत जात राहिले आहेत, त्यामुळे वस्ती जुनी आहे. पूर्वी घरांमध्ये तळमजल्यावर गोठा असे. दार वाजलं की पहिल्या मजल्यावरच्या खोलीतनंही उघडायची सोय आहे. मला खूप आवडलं होतं ते. (दिल्लीला गेले होते अनेक वर्षांपूर्वी. बंगल्यांची वस्ती. तिथेही बेल वाजली की अगदी वरच्या मजल्यावरच्या खोलीत असलेला माणूस दारात आलेल्या व्यक्तीशी बोलायचा, व ओळख निघाल्यावर वरूनच दार उघडायचं. भन्नाट कल्पना.) असो, तर घरी गेलाे. हे पाळंदे कुटुंबाचं घर. पिढीजात पौरोहित्याचा व्यवसाय. सुमीतच्या भाषेवर हिंदी व भोजपुरीचे संस्कार होते, परंतु त्याच्या वडिलांची भाषा सदाशिवपेठेतही शोभावी अशी. आईचीही. इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतरही जपलेली. थोडा वेळ गप्पा मारून आम्ही निघालो, पुन्हा बाहेर पडायलाही सुमीतची मदत लागलीच, नाहीतर आम्ही तासनतास तिथेच घुटमळत राहिलो असतो हे नक्की. मुख्य रस्त्यावर येऊन ईरिक्षा करून घरी पोचलो.

उद्याचा शेवटचा दिवस. चार भरगच्च दिवस संपले होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला बाहेर पडलो, अस्सी घाटावर होणाऱ्या सुबह ए बनारस या कार्यक्रमासाठी. हवेत छान गारवा होता. आज वर्षाताई नव्हती आली, त्यामुळे आम्ही साध्या आॅटोरिक्षाने गेलो. घाट स्वच्छ. नदीच्या बाजूला रंगमंचासारखी व्यवस्था. सातआठ तरुण मुलं एकसारखे कपडे घालून नदीकडे तोंड करून उभं राहून गंगा नदी, सर्व दिशा आणि सूर्यदेवाची पूजा करतात. इथल्या वेदशाळेतल्या सहासात मुलींनी वेदांतल्या ऋचा म्हणत या नेत्रसुखद कार्यक्रमाची सुरुवात केली. दशाश्वमेध घाटावर रोज संध्याकाळी गंगा आरती होते, तेव्हा ध्वनिमुद्रित गाणी लावलेली असतात. ही पहाटेची आरती प्रत्यक्ष वेदपठणाने होते, म्हणून ती छान वाटते. पूजा संपल्यानंतर घाटाच्या एका बाजूला उभारलेल्या छोट्या मंचावर कानपूरच्या एका युवकाने अहिर भैरव गायला सुरुवात केली. स्थानिक कलाकारांना हा मंच फारच चांगली संधी देतो. बनारसच्या आयुक्तांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे असं कळलं. गंगा नदी हा इथला USP आहेच, परंतु आरतीही अशा पद्धतीने कोरिअोग्राफ केलेली असते की, जिचे व्हिडिओ व छायाचित्रंही आकर्षक व्हावीत. एकूणच या शहराचं मार्केटिंग जबरदस्त केलेलं जाणवलं. आम्ही थोडा वेळ गाणं ऐकलं आणि गरम काॅफी घेतली. काॅफी पिऊन नदीपाशी गेलो तर नावाडी मागे लागले, उस पार जाने के लिए. गंगेच्या पलिकडच्या किनाऱ्यावर वाळवंट आहे, तिथे काकड्या, कलिंगडं, टरबूज, खरबुजांची शेती होते उन्हाळ्यात. आम्हालाही माेह आवरला नाही आणि नावेत बसलो. धुरक्यामुळे सूर्यमहाराजांचा उदय झाला असला तरी दर्शन मात्र झालं नव्हतं. नावेतनं होईल अशी आशा होती ती काहीच मिनिटांत खरी ठरली. केशरीगुलाबी रंगाचा गोळा आकाशात दिसू लागला. मारुतीला त्याला पकडावंसं का वाटलं असेल, ते कळलंच जणू.

आमच्यातली शुभांगी गाणारी, मी नि मेघना ऐकणाऱ्या. मग शुभांगीने गायला सुरुवात केली अलख निरंजन गायो... वल्ह्यांची चुबुक चुबुक, गंगेच्या लाटा आणि शुभांगीचं गाणं. आणि समोरून वर येणारा सूर्य. असा अप्रतिम योग जुळून आला होता की, आम्ही भान हरपून बसलो होतो. तो नावाडीही शांतपणे ऐकत होता. पंधरावीस मिनिटांनी पल्याड उतरलो. भलंमोठं वाळवंट. एखादा घोडा, माथेरानला असतो तसा फिरायला. खूपशा घारी घिरट्या मारणाऱ्या. थोडा वेळ तिथेच फिरलो आणि परतलाे. इकडे येऊन घाटावरनं, नदीच्या काठानं चालायला सुरुवात केली. जो भाग परवा नावेतनं पाहिला होता, तो आता आम्ही पायी फिरत होतो.

यंदा गंगेला मोठा पूर आला होता. अनेक दिवस सर्व घाट बुडालेले होते. अजूनही या पुराच्या खुणा दिसत होत्या, पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीच्या रूपात. अनेक घाट, विशेषकरून जे फार गजबजलेले नसतात नेहमी, तिथली माती काढण्याचं काम अजून सुरू व्हायचं आहे. त्यामुळे पायऱ्या मातीत लपून गेल्या आहेत.

आम्ही चालायला लागलो तेव्हा सात वाजले असतील. घाटावर आंघोळी करणाऱ्यांची लगबग सुरू झाली होती. अनेक स्थानिक लोक, रोज गंगास्नान करणारेही लक्षात येत होते. पर्यटकांमध्ये सर्वाधिक भरणा तामिळ, तेलगु व बंगाल्यांचा होता. त्याखालोखाल मराठी. आम्ही तिघी अगदीच उठून दिसत होतो, बूटबिट घालून चालणाऱ्या. वाटेत लागला हरिश्चंद्र घाट. दोन चिता जळत होत्या तिथे. एक क्षण वाटलं काय करावं. ते टाळायचं तर घाट वर चढून रस्त्यावर जाऊन पुढच्या घाटावर खाली उतरावं लागलं असतं. मग गेलो तशाच चितांच्या शेजारून. दशाश्वमेध घाटाशी पोचेपर्यंत बनारस झडझडून जागं झालं होतं आणि घाटावर गर्दी वाढत होती. रस्त्यावर आलो. दुकानं उघडलेलीच होती अनेक. एके ठिकाणी दोसावाला दिसला, भूक तर लागलीच होती सणकून. दोसावाल्याभोवती गर्दी होतीच, दाक्षिणात्यांचीच. बटर दोसा खाल्ला आणि घराकडे आलो. थोड्या वेळाने नाश्ता केला आणि सामान आवरायला घेतलं. एक खोली दहा वाजता परत करायची होती, बुकिंग झालेलं होतं. मी नि शुभांगीने बॅगा मेघनाच्या खोलीत टाकल्या आणि चौघी पुन्हा बाहेर पडलो. इथे खीरमोहन नावाची मिठाई मिळते, गुलाबजामसारखी. क्षीरसागर या मिठाईच्या दुकानांची साखळी आहे, त्यातल्या एकात गेलो. गुजिया, लवंगलतिका चाखलं. मिश्टी दोई खाल्लं. आणि मिठाया घेऊन जरा बाजार फिरलो. ऊन होतं, गर्दीही होतीच. पण आजचा शेवटचा दिवस घरात बसून काढायचा नव्हता. आणि मार्केट असं फिरलोच नव्हतो आम्ही. छोट्यामोठ्या वस्तू घेतल्या आणि परतलो. जेवलो. तोवर राजेंद्रभय्या आमच्या साड्या घेऊन आला. त्याचं पॅकिंग केलं. प्रत्येकीचाच एकेक डाग वाढला होता. वर्षाताईला तर इतकं टेन्शन आलं सामानाचं, नानीकडून वजनाचा काटा घेऊन चेक केलं २५ किलोच्या आत आहे ना सामान ते.

विमानतळावरून येताना लागलेला ट्रॅफिक पाहता लवकरच निघायचं ठरवलं. सव्वासातच्या विमानासाठी सव्वाचारलाच निघालो. मंदगती चालली होती इनोव्हा. शेवटचं बनारस डोळ्यांत साठवून घेता यावं म्हणूनच असावी. ताजे फ्लाॅवरचे गड्डे, रसरशीत वांगी, मुळा, मटार, सगळं घ्यावंसं वाटत होतं. गावातनं बाहेर पडता पडताच अंधारून यायला लागलं. समोर प्रचंड धूळ दिसत होती. आता टेन्शन येऊ लागलं, विमान लँड कसं होणार या धुळीत. आणि टेक आॅफ कसं करणार.

आत गेलो, विमान वेळेवर होतं. विमानतळ छोटासा असला तरी खूप गर्दी होती, बसायलाही जागा नव्हती. स्पाइसजेट आणि इंडिगो अशी दोन्ही दिल्लीची विमानं एकाच वेळी लागली होती. इकडचे प्रवासी तिकडे, तिकडचे इकडे असा निव्वळ यष्टीष्टँड फील आला होता. बोर्डिंग पासवर गेट नं २, प्रत्यक्षात ते होतं गेट नं. ४. अखेर बसलो विमानात. मध्येच एकदा विमानात घोषणा झाली आपण खजुराहो शहरावरून उडतोय. खाली पाह्यलं तर चांदणीच्या आकारातलं शहर, म्हणजे शहरातले दिवे दिसले. आता ते खरंच खजुराहो होतं की मी झोपेत होते, आठवत नाहीये. पण शहर भारी दिसत होतं. नंतर उतरायच्या आधी रात्रीची लखलखणारी मुंबईही अशीच दिसली, माझी वाट पाहणारी, माझ्या गोष्टी ऐकायला आतुर असणारी.

उतरलो, मोबाइल सुरू केले. एका जबरदस्त बातमीने आमचं स्वागत केलं. तीच ती, पाचशे व हजाराच्या नोटा करण्याच्या निर्णयाची. नशिबाने आम्ही जवळच्या सगळ्या पाचशेहजाराच्या नोटा उडवून आलो होतो...

या सगळ्यातून पुरून उरणारं बनारस कसं वाटलं त्याबद्दल इथे वाचा. 

Comments

  1. छानच झालय बनारसिया!

    ReplyDelete
  2. धन्यवाद अरुणाताई.
    डाॅक, कळतात बरं असली बोलणी...

    ReplyDelete
  3. तिन्ही आर्टिकल्स वाचली. तुमच्या डोळ्यांनी बनारस फिरून आलो. मस्त!

    ReplyDelete

Post a Comment