आमच्या नंदिनी मॅम

रूपारेल महाविद्यालयातून पदवी मिळवल्याला २६ वर्षं झालीत. तिथली पाच वर्षं आनंदात तर गेलीच, पण या पाच वर्षांनी मला अशा मैत्रिणी दिल्या, ज्या अजून माझ्या मैत्रिणी आहेत, आम्ही दर दोनतीन महिन्यांतनं प्रत्यक्ष भेटतो, व्हर्चुअल जगात तर रोजच भेटत असतो. याच काळात मानसशास्त्र विभागातील तीन शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड प्रभाव होता, जो अजून कायम आहे.
आमच्या विभागप्रमुख डाॅ. नंदिनी दिवाण जानेवारीत वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या. पुढचे दोन महिने त्या शिकवत राहिल्या कारण अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. परवा शनिवारी त्यांचा एक छोटासा निरोप समारंभ झाला, आमच्या सायकाॅलाॅजी लॅबमध्ये. १९९१ ते २०१६ या काळात या विभागात शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास तीस जण आले होते. काही जणांचा आता मानसशास्त्राशी थेट संबंध उरलेला नाही, परंतु बहुतेक जणांचं करिअर याच विषयाशी निगडित आहे. एचआर विभाग ते फोरेन्सिक लॅब ते क्लिनिकल काउन्सेलिंग अशा विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थी काम करत आहेत. यातले अनेक विद्यार्थी विभागाच्या सतत संपर्कात असतात व त्यांच्या अनुभवांचा फायदा नवीन विद्यार्थ्यांना करून देत असतात. लॅब, म्हणजे आमच्या वर्गाचं संपूर्ण नूतनीकरणही आम्हा विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणग्यांमधूनच केलंय, साडेपाच लाख रुपयांहून अधिक रक्कम आम्ही विभागासाठी उभी करू शकलो, याचा आनंद वाटतो. आता लॅबमध्ये काही संगणक आहेत आणि एक स्मार्ट टीव्हीही. काॅलेजकडे यातलं काहीही करायला पैसा नाही, असं स्पष्ट करण्यात आलं होतं, त्या कारणांची चर्चा करायची ही जागा नाही.
डाॅ. दिवाण यांच्यानंतर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डाॅ. नीता ताटके विभागप्रमुख झाल्या आहेत. डाॅ. ताटके उत्तम जिम्नास्ट आहेत, अजूनही रोज संध्याकाळी त्या समर्थ व्यायाम मंदिरात भेटतातच. त्या दिवशी त्या म्हणाल्या की, एकदा भौतिकशास्त्र विभागाच्या शिक्षकांनी आम्हाला विचारलं, आमच्या मुलांना खूप समस्या आहेत, अभ्यास कसा करायचा तेही त्यांना कठीण जातंय, तुम्ही काही मदत करू शकता का. या समस्या प्रामुख्याने FYBSc ला प्रवेश घेणाऱ्यांच्या होत्या. ही मुलं कोण असतात? एकतर यातली अनेक मुलं वेगळ्या महाविद्यालयांतनं आलेली असतात. त्यातली अनेक इंजीनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश न मिळाल्याने निराश होऊन आलेली असतात. मग अशांसाठी मानसशास्त्र विभागाने काही खास सत्रं घेऊन त्यांना अभ्यासाकडे वळवलं. मानसशास्त्र या विषयाकडे आपण आता थोड्या अधिक मोकळेपणाने पाहू लागलो आहोत. त्यामुळे महाविद्यालयातील इतर विभागांनाही या विभागाची मदत हवीशी वाटते आहे.
तिसऱ्या शिक्षक होत्या सुषमा साठे. या २००३मध्ये आॅस्ट्रेलियात स्थायिक झाल्या. परंतु तोवर दिवाण-ताटके-साठे हे त्रिकूटच विभाग सांभाळत होतं. रूपारेलमध्ये गेल्या १०-१२ वर्षांपर्यंत अकरावी बारावीला मानसशास्त्र शिकवणाऱ्या सबिता बबानी यांचा विषयाची गोडी लावण्यात प्रचंड हातभार होता. अप्रतिम इंग्रजी, गोड चेहरा आणि शिकवण्याची हातोटी या गुणांमुळे माझ्यासकट अनेक जण मानसशास्त्रात बीए करायचं या निर्णयापर्यंत आलेले होते. आणि तो निर्णय या त्रिकूटाने अगदी तंतोतंत सार्थ ठरवला.
डाॅ. दिवाण विद्यार्थी, लेक्चरर आणि विभागप्रमुख अशा रूपात जवळपास ४० वर्षं रूपारेलमध्ये होत्या. कडक शिस्तीच्या, सगळ्या गोष्टींत परफेक्शनचा आग्रह धरणाऱ्या नंदिनी मॅम यांच्याबद्दल काडीचीही आपुलकी न वाटणाराही विद्यार्थीवर्ग आहेच. परंतु, यांच्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांच्याकडून खूप काही शिकणारा वर्ग मोठा आहे. परवा तीस जण होतो, मॅमना प्रत्येकाचं नाव लक्षात होतंच पण त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय, हेही त्या सांगत होत्या. त्यांचं अक्षर सुंदर होतं, अजूनही आहे. त्यांना उत्तम संगीत, चित्रकला, चित्रपट, पर्यटन या सगळ्यात रस आहे. त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित आहेत. कौतुक appreciation करावं तर त्यांनीच, इतकं बारकाव्याने त्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलतात. गुरुपौर्णिमेला किंवा शिक्षक दिनाला माझी विभागात फेरी ठरलेलीच. दर वेळी त्या माझ्यासाठी छोटीशी भेट आणणारच. आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडनं शिकावा.
परवा आम्ही काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल काय वाटतं ते लिहिलेलं एकत्र करून छोटी पुस्तिका छापून डाॅ. दिवाण यांना भेट दिली.
डाॅ. ताटके यांना दिवसभरातनं इतक्या गोष्टी करायला वेळ कसा मिळतो, तरी त्या कायम हसतमुख कशा असतात, असे प्रश्न पडावे. महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून असणाऱ्या व शिकवण्याच्या जबाबदाऱ्या, समर्थ व्यायाम मंदिरातील जबाबदारी, घर हे सगळं त्या आनंदाने आणि पॅशनेटली सांभाळतात. त्या विभागप्रमुख झाल्यात, त्यामुळे डाॅ. दिवाण आता तिथे भेटणार नाहीत, हा सल बराचसा कमी झालाय, हे नक्की.
महाविद्यालय किंवा शाळेत चांगले शिक्षक मिळणं, हा नशिबाचा भाग वाटतो कधीकधी. सगळ्यांच्याच काही अशा रम्य आठवणी नसतात आपापल्या Alma mater बद्दलच्या. असं भाग्य मला लाभलं, इतकंच.

Comments