Shri Samarth Tea - my favourite adda

मुलुंडमधलं एक महत्त्वाचं भेटीगाठीचं ठिकाण, पूर्वेकडे रेल्वे स्थानकापासून एका मिनिटाच्या अंतरावरचं श्री समर्थ टी. आज गुढीपाडवा,  या दुकानाचा सुवर्णमहोत्सव. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, अशी ओरड आपण ऐकत असतो नेहमीच. या दुकानाचे मालक गोडबोले याला मोठा अपवाद.

मूळ दादरमध्ये राहणारे रामचंद्र गोडबोले महापालिकेत नोकरी करायचे. ५० वर्षांपूर्वी एका खेडेगावाइतक्या लहान असलेल्या मुलुंडमध्ये त्यांनी एक गाळा घेऊन तिथे चहाचं दुकान टाकलं. कुटुंबही काही काळानंतर मुलुंडमध्ये राहायला आलं. त्या वेळी चहा प्यायला दुकानात येणारे तरुण, आता सत्तरीत अालेत, पण चहाची चव बदललेली नाही याचे ते साक्षीदार आहेत. मी गेल्या दहाबारा वर्षांपासून चहा पितेय इथे, मी तेवढ्या काळाची साक्ष देऊ शकते. चहाच नव्हे तर पोहे, उपमा, साबुदाण्याची खिचडु, साबुदाणा वडा, आणि काउंटरवर आल्या आल्या संपणारा बटाटावडा यांच्याही चवी कायम आहेत. सर्व पदार्थांच्या घटकांचं प्रमाण अनेक वर्षांपासून तेच आहे, त्यात बदल नाही, हे याचं मुख्य कारण.

दहाएक वर्षांपूर्वी काका गेले. त्यांचा मुलगा राजेश १९८१पासून, म्हणजे १६/१७ वर्षांपासून दुकानात येत होताच, तो आता दुकान सांभाळतो. राजेशचा मुलगा अनुरागही हे दुकान पाहातो, त्याचा स्वत:चा केटरिंगचा व्यवसाय आहे. राजेशची बायको रमाने दहाएक वर्षांपूर्वी दुकानात पोळीभाजी ठेवायला सुरुवात केली. आता सकाळ संध्याकाळ पोळीभाजी, नाश्ता मिळतो. नाश्त्याच्या पदार्थांचे वार साधारणपणे ठरलेले असतात. सणावारी शिरा असतोच.

असं म्हणतात की केटरिंग किंवा खाद्यपदार्थांच्या व्यवसायात १०० टक्के नफा असतो. पण या नफ्यात प्र चं ड शारीरिक मेहनत असते. कमालीचा तणाव असतो. ग्राहकांचं समाधान या व्यवसायात सांभाळणं जरा कठीणच असतं, कारण तोंडात घास गेल्या गेल्या किंवा वास घेऊनच तो जमलाय की बिघडलाय याची पावती जात असते. एकदा अनुरागकडे जेवणाची आॅर्डर दिली की, पुढच्या कार्यक्रमाला त्याच्याचकडे येणारे बहुतेक ग्राहक आहेत. अनुराग शाकाहारी, मांसाहारी, पंजाबी, मराठी पद्धतीचे पदार्थ देतो, ते निव्वळ बोटं चाटायला लावणारे असतात.

राजेश आणि अनुराग अतिशय थंड डोक्याने, न चिडता, वैतागले तर चेहऱ्यावर तो न दाखवता, दुकान चालवतात. ग्राहक काय वाट्टेल ते प्रश्न विचारतात, त्यांना शांतपणे उत्तरं देतात. नोकरी करत नव्हते तेव्हा अनेकदा पोळीभाजीचा काउंटर मी सांभाळलाय, त्यामुळे डोकं शांत ठेवणं हे किती मोठं आव्हान आहे, याची जाणीव आहे. पोळ्यांना हात लावून पाहायचा असलेल्या काकू, पोळ्या ताज्याच आहेत ना असं विचारणाऱ्या काकू, कोशिंबीर किंवा भाजी कशी दिसते ते पाहू असं म्हणणाऱ्या काकू, गंमती सांगाव्या तितक्या कमीच. जेवणाची आॅर्डर असते तेव्हाचं बार्गेनिंग तर ऐकण्यासारखं असतं. खिरीत काजूबदाम घाला हं, असं ठासून सांगणारे काका पैसे सांगितले की, जरा अॅडजस्ट करा म्हणतात तेव्हा हसावं की रडावं कळत नाही. साखरपुड्याच्या जेवणात, जरा फॅन्सी पदार्थ हवेत नवऱ्यामुलाकडच्या लोकांना पण आमचं बजेट तेवढं नाही, प्लीज काहीतरी कमी करा, अशी विनंती करणारे वडील पाहिले की, वाटतं काय ही जबरदस्ती सासरच्या मंडळींची. पण पोळीभाजी नेणारे नियमित ग्राहकही खूप आहेत. खासकरून ज्येष्ठ नागरिक. इथले पदार्थ मसालेदार वा तिखट नसतात, साधारण ब्राह्मणी पद्धतीचा साधा स्वयंपाक असतो. त्यामुळे वयस्कर वा आजारी मंडळींना ते आवडतात. रविवारी पोळीभाजी नसते, सोमवारी दुकान बंद असतं, त्यामुळे हे दोन दिवस आमचे हाल होतात, असं अनेक जण आवर्जून सांगतात.

दुकानात काम करणारी मुलंही अनेक वर्षांपासून जोडलेली आहेत, सहसा कोणी नोकरी सोडून जात नाही. त्यातली बहुतेक लांजा तालुक्यातली आहेत. त्यांना गोडबोले कुटुंब अत्यंत प्रशंसनीय वागणूक देतं. त्यांच्या खाण्यापिण्याच्याही वेळा ठरलेल्या आहेत, अनेकांची जवळच राहायचीही सोय आहे. दुकानाच्या वेळातही बदल होत नाही.

राजेश पहाटे साडेपाचला दुकान उघडतो तेव्हा दोनतरी ग्राहक वाट पाहात थांबलेले असतात. दुपारी बाराच्या ठोक्याला बंद करतो, तेव्हाही चहा आहे का विचारणारे येतच असतात. दुपारी तीन ते रात्री आठ दुकान सुरू असतं. २४ तास उघडं ठेवलं तरी चालेल अशी परिस्थिती आहे, पण राजेशला ते पटत नाही. मुलांना आराम हवा, सुटी हवी, मलाही हवीच, यावर तो ठाम आहे.

आम्हा मैत्रिणींचा हे दुकान म्हणजे हक्काचा अड्डा. रविवारी संध्याकाळी आम्ही दुकानात सापडणारच. आमच्यासारखेच अनेक ग्रूप आहेत मुलुंडमध्ये, ज्येष्ठ नागरिकांचे, तरुणांचे, जे समर्थमध्ये भेटतात नियमितपणे.

रमा आणि राजेश यांच्याशी माझी ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही, पण ओळख ते मैत्री हा प्रवास काही मिनिटांचा असणार हे नक्की. राजेश अंजलीचा सख्खा चुलतभाऊ हे कळल्यावर तर या नात्याला आणखी एक पदर लाभला. आज माझ्या पूर्ण कुटुंबाचं गोडबोले कुटुंबाशी एक सुंदर मैत्रीपूर्ण नातं आहे, त्याबद्दल मला कायम ऋणच वाटत आलंय.

दुकानाची एवढी मोठी वाटचाल कौतुकाची. पुढच्या ५० वर्षांसाठी भरभरून शुभेच्छा.

Comments