Hold your tongue!

उचलली जीभ...
यशस्वी झालेल्या, लोकप्रिय असलेल्या, भरपूर पैसे कमावणाऱ्या, सत्तेत असणाऱ्या अनेक महिला भारतात अनेक वर्षांपासून आहेत खरं तर. त्यांनी त्यांच्या मेहनतीने, अंगभूत कौशल्यांनी, अनुभवांनी शहाणं होऊन हे यश, लोकप्रियता, पैसा, सत्ता कमावलेलं असतं. पण एकविसाव्या शतकाची जवळपास दोन दशकं उलटली तरी पुरुषांना याची सवय झालेली दिसत नाही. त्यांना अशा महिलांना कमी लेखायची, तिच्या यशाला किंवा तिच्या सत्तेला खालच्या दर्जाचं दाखवायची आंतरिक गरज असते असं वाटावं, अशी वक्तव्यं गेल्या काही दिवसांत जाहीरपणे केली गेलेली कानावर आलीत. पत्रकार महिला यशस्वी होतात कारण त्यांनी सत्तारूढ पुरुषांशी लागेबांधे जुळवलेले असतात, असं विधान सत्तारूढ भाजपच्या एस.व्ही. शेखर नामक एका नेत्याने केलंय. पत्रकारितेच्या क्षेत्रात महिला बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असल्या तरी गेल्या वीसेक वर्षांत त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्यांवरून या पत्रकार महिला रोज दिसत राहतात, त्या काही महत्त्वाच्या बातम्या सांगत असतात किंवा तज्ज्ञांशी काही विशिष्ट विषयांवर चर्चा करत असतात. त्यांच्या हातात प्रत्यक्ष नसली तरी सत्ता किंवा अधिकार असल्याचा भास या चित्रातून नक्कीच निर्माण होतो. आणि म्हणूनच शेखरवर्गीयांसाठी त्या सोपे लक्ष्य होतात. बाई आपल्या वरचढ असूच शकत नाही, यावर अशा पुरुषांच गाढ विश्वास असताे. कारण त्यांनी लहानपणापासून आजूबाजूच्या सर्व पुरुषांना तसंच वागताना पाहिलेलं असतं. बाईला तिच्या कर्तृत्वावर, कष्टावर, कौशल्यावर, अनुभवावर काही मिळवताच येत नाही, हेच त्यांनी बाळगलेलं असतं उराशी कायम. त्यामुळेच यशस्वी बाई म्हणजे योग्य त्या पुरुषाशी संबंध ठेवणारी, यापेक्षा वेगळं उत्तर त्यांना सुचत नाही. आणि समजा, अशी एखादी बाई असेल, जिने बाॅसशी संबंध ठेवून पदोन्नती मिळवलीय, किंवा पगारवाढ मिळवलीय, तर त्या बाॅसनेही स्वत:ची लायकी दाखवली असतेच की. पण नाही, तसं करण्याचा त्याचा अधिकारच असतो नाही का, शेखरवर्गीयांनुसार! चूक फक्त बाईची असते.
हे असं बोलत राहतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सत्तेवर असणारे पुरुष कारण त्यांना वेगळं काही माहीतच नसतं. वास्तवाची जाणीव त्यांना, सगळ्याच पुरुषांना, करून देण्याची जबाबदारी आईवडील, शिक्षक, सहकारी, मित्रवर्ग, सगळ्यांचीच आहे.

Comments